जळकोटात जोरदार पाऊस, बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:13 IST2021-07-12T04:13:54+5:302021-07-12T04:13:54+5:30

जळकोट : शहरासह तालुक्यात रविवारी दुपारी ३ ते ४.३० या दरम्यान दीड तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांना ...

Heavy rain in Jalkot, Baliraja was relieved | जळकोटात जोरदार पाऊस, बळीराजा सुखावला

जळकोटात जोरदार पाऊस, बळीराजा सुखावला

जळकोट : शहरासह तालुक्यात रविवारी दुपारी ३ ते ४.३० या दरम्यान दीड तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले असून, परिसरातील नदी-नाले भरुन वाहू लागले आहेत. शहरात आतापर्यंत ३०५ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद तहसील कार्यालयात झाली आहे.

तालुक्यात जूनमध्ये पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आणि खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात करण्यात आली. दरम्यान, पावसाने १० ते १२ दिवस उघडीप दिली होती. त्यामुळे शेतकरी धास्तावला होता. दरम्यान, जुलैमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वी रिमझिम पाऊस झाला होता. रविवारी दुपारी दीड तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील नदी-नाले वाहू लागले आहेत. जळकोट मंडलात सर्वाधिक पाऊस झाला आहे. घोणसी महसूल मंडलात कमी पाऊस झाला आहे. रविवारच्या पावसामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे.

मागील पंधरवड्यात पावसाने दडी मारल्याने कोवळी पिके वाळत होती. मात्र, मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे. जोरदार वाऱ्यामुळे दोन तास वीज गुल झाली होती. या पावसामुळे सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, सूर्यफुल, कापूस पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. तालुक्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला आहे.

Web Title: Heavy rain in Jalkot, Baliraja was relieved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.