हमीभावातील वाढ तोकडी; पुनर्विचार करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:14 IST2021-06-11T04:14:16+5:302021-06-11T04:14:16+5:30

लातूर : केंद्र शासनाने उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्याचा दावा केला असला तरी वास्तवात महागाईतील उत्पादन खर्च विचारात घेतले ...

Guaranteed growth rate; Demand for reconsideration | हमीभावातील वाढ तोकडी; पुनर्विचार करण्याची मागणी

हमीभावातील वाढ तोकडी; पुनर्विचार करण्याची मागणी

लातूर : केंद्र शासनाने उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्याचा दावा केला असला तरी वास्तवात महागाईतील उत्पादन खर्च विचारात घेतले तर हमीभावातील वाढ अतिशय तोकडी आहे. त्यामुळे शासनाने याचा पुनर्विचार करून हमीभावात वाढ करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्यावतीने केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे केली आहे. कडधान्य व तेलबिया उत्पादनात झालेली घट आणि वाढलेली महागाई लक्षात घेता, दोन्ही पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हमीभावात मोठी वाढ होईल, अशी आशा होती. मात्र, केंद्राने फक्त तूर आणि उडीद पिकाच्या हमीभावात ३०० रुपयांची वाढ केली आहे तर मुगासाठी गतवर्षीपेक्षा ७९ रुपयांची वाढ केली आहे. देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन असलेल्या सोयाबीनच्या हमीभावात ७० रुपयांनी वाढ केली आहे. म्हणजे यावर्षी सोयाबीनला ३ हजार ९५० रुपये हमीभाव मिळणार आहे. महागाईमुळे खत, बियाण्यांच्या झालेल्या भाववाढीमुळे ३ हजार ९५०चा सोयाबीनचा भाव शेतकऱ्यांना परवडू शकत नाही. यामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. नफा तर बाजूलाच राहिला.

मागच्या वर्षी सोयाबीनला मार्केटमध्ये उच्चांकी ७ हजार ५०० रुपये भाव मिळाला. मात्र, शेतकऱ्यांजवळील सोयाबीन संपल्यानंतर हा भाव मिळाल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि व्यापाऱ्यांनाच जास्त झाला. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सोयाबीनला ३ हजार ९५० रुपये हमीभाव जाहीर करून तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. अनेक भागात प्रमुख पीक असलेल्या धानाला गतवर्षीच्या तुलनेत फक्त ७२ रुपयांची वाढ मिळाली आहे. धानाला आता प्रतिक्विंटल फक्त १ हजार ४४० रुपये भाव मिळणार आहे. जो उत्पादन खर्चाच्या कमी आहे.

कापूस उत्पादकांनाही न परवडणारा दर

कापसाला लांब धाग्यासाठी २०० रुपये वाढ देत ५ हजार ५२ रुपये आणि मध्यम धाग्यासाठी २११ रुपयांची वाढ करत ५ हजार ७२६ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. हा दर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना परवडणारा नाही. कापूस उत्पादक शेतकरी दरवर्षी कीड, नैसर्गिक आपत्तीने त्रासलेला असतो. शासनाने नव्याने हमीभाव जाहीर करावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी केली आहे.

Web Title: Guaranteed growth rate; Demand for reconsideration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.