मुगापाठोपाठ उडदाचीही आवक, आधारभूत किमतीपेक्षा अधिक दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST2021-09-10T04:26:34+5:302021-09-10T04:26:34+5:30
उदगीर : उदगीर मार्केट यार्डात खरिपातील नवीन मुगापाठोपाठ उडदाची आवक सुरू झाली असून, गुरुवारी जवळपास ५०० क्विंटलपेक्षा जास्त आवक ...

मुगापाठोपाठ उडदाचीही आवक, आधारभूत किमतीपेक्षा अधिक दर
उदगीर : उदगीर मार्केट यार्डात खरिपातील नवीन मुगापाठोपाठ उडदाची आवक सुरू झाली असून, गुरुवारी जवळपास ५०० क्विंटलपेक्षा जास्त आवक झाली. शेतमालात ओलावा आणि चार दिवसांपासूनच्या पावसामुळे डाग पडल्याने दरात फरक पडला आहे. सध्या ६ हजार ५०० ते ७ हजार ४०० प्रतिक्विंटल भाव मिळत असून, केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीपेक्षा बाजारात जास्त भाव मिळत आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांच्या सीमेवर असलेल्या उदगीर येथील मार्केट यार्डात मूग व उडदाची आवक महाराष्ट्रापेक्षा बाजूच्या कर्नाटकातून, नांदेड जिल्ह्यातून आणि तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात होते. केंद्र शासनाने हमीभाव ६ हजार रुपये प्रतिक्विंटल जाहीर केला आहे; परंतु प्रत्यक्षात बाजारात हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. त्यामुळे यंदा हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्यता कमी आहे.
यंदा जून महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली होती. तालुक्यात १ हजार २०५ हेक्टरवर उडदाचा पेरा झाला आहे. तालुक्यातील एकूण ६४ हजार हेक्टर खरिपाच्या क्षेत्राच्या तुलनेत हा पेरा कमीच आहे. त्यातच जुलै महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने उडदाचे उत्पादन कमी प्रमाणात झाले. त्यामुळे बाजारात आवक मर्यादित होत आहे. जी आवक आहे, ती शेजारील नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यांतील व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातून होत आहे. परवा तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे उडदामध्ये ओलावा मोठ्या प्रमाणात असल्याने आणि डाग लागल्याने चांगल्या शेतमालाच्या तुलनेत सर्वसाधारण उडदाला कमी दर मिळत आहे, असे व्यापारी सांगत आहेत.
गुरुवारी येथील मार्केट यार्डात ५०० क्विंटलपेक्षा जास्त उडदाची आवक झाली. यावर्षी सर्वच पिकांची स्थिती चांगली असून, उत्पादनही कमी होत असल्याने दरही स्थिर राहणार नाहीत, असे व्यापारी सांगत आहेत. साधारणपणे उडदामध्ये १२ टक्के ओलावा असावा; परंतु सध्या २० ते २५ टक्क्यांपर्यंत ओलावा असल्याने शेतकऱ्यांना दर कमी मिळत आहे. येथील बाजारातील उडदाला दिल्ली, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड राज्यातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. सध्या तामिळनाडू व आंध्र प्रदेशात येथून उडीद जात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. आता पावसाने उघडीप दिल्याने येणाऱ्या काळात उडदाच्या राशीला वेग येईल.
दरात घसरण होण्याची आशा कमी...
उदगीरच्या बाजारात येणाऱ्या उडदाला दक्षिण भारतातील तामिळनाडू, आंध्र प्रदेश, दिल्ली राज्यातून मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे. सध्या आयातीत उडदाची आवक कमी असल्याने येथील शेतमालाला चांगली मागणी असल्याने दरही चांगले मिळत आहेत. पावसाने उघडीप दिल्याने उडदाच्या राशींना वेग येईल; परंतु दरात फारशी घसरण होणार नसल्याचे व्यापारी लक्ष्मीकांत चिकटवार यांनी सांगितले.