अट शिथिल करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:14 IST2021-06-11T04:14:15+5:302021-06-11T04:14:15+5:30
प्लाॅटची खरेदीखताची नोंद सातबारावर घेण्याकरिता अट शिथिल करण्याची मागणी शकील मणियार यांनी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...

अट शिथिल करण्याची मागणी
प्लाॅटची खरेदीखताची नोंद सातबारावर घेण्याकरिता अट शिथिल करण्याची मागणी शकील मणियार यांनी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. चालू नियमाप्रमाणे खुल्या प्लॉटची खरेदी खताच्या रकमेच्या २५ टक्के रक्कम महसूल म्हणून भरल्यानंतर याची नोंद सातबारावर घेण्यात येत आहे. ही जाचक अट न परवडणारी असून या अटीमुळे सर्वसामान्य गरिबांना अनेक शासकीय योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. तरी ही अट शिथिल करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रस्त्यावरील खडीमुळे वाहनधारकांची गैरसोय
लातूर : शहरातील बार्शी रोडवरील महिला तंत्रनिकेतन ते पाच नंबर चौकापर्यंत रस्त्याचे काही दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, काही ठिकाणी खड्डे पडल्याने संबंधित यंत्रणेच्या वतीने दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, सदरील काम करताना खडी रस्त्याच्या मधोमध पडली आहे. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. याकडे संबंधित विभागाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
रिंग रोड परिसरात रस्त्यावर कचरा
लातूर : शहरातील रिंग रोड परिसरात रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. वाऱ्यामुळे हा कचरा रस्त्यावर येत असल्याने वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या परिसरात नियमित घंटागाडी येत नसल्याची नागरिकांची ओरड असून, त्यामुळे मोकळा प्लाॅट तसेच रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात आहे. याकडे लातूर शहर महापालिकेने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
एसटीच्या प्रवासी सेवेला मिळतोय प्रतिसाद
लातूर : जिल्ह्यात अनलॉक झाल्यानंतर एसटी महामंडळाच्या वतीने बससेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे बससेवा बंद होती. सध्या बसमध्ये मास्कचा वापर बंधनकारक असून, मास्क, फिजिकल डिस्टन्स आणि सॅनिटायझर आदी नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. आगामी काळात बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात वाढेल अशी अपेक्षा आहे.
मशागतीची कामे पूर्ण झाल्याने पावसाची प्रतीक्षा
लातूर : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. शेतकऱ्यांच्या वतीने बियाणे, खतांचे नियोजन करण्यात येत असून, पावसाची प्रतीक्षा लागली आहे. जिल्ह्यात जवळपास ५ लाख ९३ हजार हेक्टरवर खरिपाचा पेरा अपेक्षित आहे. त्यानुसार कृषी विभागाच्या वतीने नियोजन केले जात आहे. दरम्यान, बाजारात महाबीजच्या बियाण्यांचा अत्यल्प साठा असल्याने शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्यांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.