अतिवृष्टीमुळे शेतात पाणीचपाणी, नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:27 IST2021-09-10T04:27:06+5:302021-09-10T04:27:06+5:30
निटूर : दोन दिवसांपूर्वी निटूर परिसरात अतिवृष्टी झाल्याने मांजरा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांत पाणीचपाणी ...

अतिवृष्टीमुळे शेतात पाणीचपाणी, नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी
निटूर : दोन दिवसांपूर्वी निटूर परिसरात अतिवृष्टी झाल्याने मांजरा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांत पाणीचपाणी साचले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी शेतक-यांतून करण्यात येत आहे.
निलंगा तालुक्यातील निटूर, शेंद, मुगाव, ढोबळेवाडी, बसपूर, शिरोळ, गिरकचाळ, वळसांगवी, शिऊर, नदीवाडी, माचरटवाडी आदी गावांपासून मांजरा नदी वाहते. गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत अतिवृष्टी झाल्याने मांजरा नदी दुथडी भरून वाहत आहे.
परिणामी, शेतात पाणीचपाणी साचले आहे. पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नुकसानीचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, मांजरा नदीवरील डोंगरगाव उच्चस्तरीय बंधारा भरला आहे. तसेच मसलगा प्रकल्प निम्मा भरला आहे. प्रशासनाने नुकसानीची पाहणी करुन पंचनामे करावेत, अशी मागणी येथील शेतकरी दिनकर निटुरे, अनिल पाटील, मुगावचे माजी सरपंच सुरेंद्र धुमाळ, बसपूरचे मोहनराव चव्हाण, ज्ञानोबा पाटील आदींनी केली आहे.
सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान...
मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. निलंगा तालुक्यातील माकणी (थोर) येथील वामन सूर्यवंशी यांनी गट क्र. ४६३ मध्ये सोयाबीनची लागवड केली होती. हे पीक काढणीसाठी आले होते. मात्र, अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतक-याच्या कुटुंबीयांनी कृषी विभागाकडे कैफियत मांडून पंचनामा करावा आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.