कोरोना ओसरतोय; २५० बाधित, तर ३४३ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:21 IST2021-05-27T04:21:36+5:302021-05-27T04:21:36+5:30
मार्च महिन्यापासून जिल्ह्यात दुसरी लाट वेगाने पसरत गेली. या महिन्यात ८ हजार ५५६ रुग्ण आढळले होते. एप्रिल महिन्यात तर ...

कोरोना ओसरतोय; २५० बाधित, तर ३४३ कोरोनामुक्त
मार्च महिन्यापासून जिल्ह्यात दुसरी लाट वेगाने पसरत गेली. या महिन्यात ८ हजार ५५६ रुग्ण आढळले होते. एप्रिल महिन्यात तर कोरोना संसर्गाने उच्चांक गाठला होता. तब्बल ३९ हजार ३४९ रुग्ण एप्रिलमध्ये आढळले होते. यामुळे आरोग्य यंत्रणा हतबल झाली होती. ऑक्सिजनचा तुटवडा, औषधांचा तुटवडा, बेडची कमतरता या अडचणीचा सामना करीत आरोग्य यंत्रणनेने रुग्णांवर उपचार केले. या लाटेत कोरोनामुळे मनुष्यहानीही मोठी झाली आहे. परंतु, सध्या कोरोना थोडा ओसरत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासूनप ५०० च्या खाली रुग्णसंख्या आली आहे. मे महिन्यातील २६ तारखेपर्यंत १५ हजार ३४५ रुग्ण आढळले आहेत. हळूहळू ही लाट ओसरत असून, कोरोना नियमांचे अनुपालन करणे आजही गरजेचे आहे. दरम्यान, बुधवारी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत १ हजार २२६ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात १२६ बाधित रुग्ण आढळले आहेत, तर २ हजार ५८१ व्यक्तींची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यात १२४ रुग्ण आढळले आहेत. प्रयोगशाळेतील चाचणीतील पॉझिटिव्हिटी रेट १० टक्के आहे. रॅपिड अँटिजन टेस्टमधील पॉझिटिव्हिटी रेट ४.८ टक्के आहे.
ऑक्सिजनचा वापरही घटला...
रुग्णसंख्या घटल्यामुळे ऑक्सिजनचा वापरही कमी झाला आहे. कोरोनाचा उच्चांक असताना एप्रिल महिन्याच्या मध्यात दररोज साडेचार हजार ऑक्सिजन सिलिंडर लागत होते. आता वापर निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. १००० ते १२०० सिलिंडरवर काम भागत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन आणि बेडचेही वांधे होते. परंतु, सध्या रुग्णालयात आणि कोविड केअर सेंटरमध्ये फक्त १ हजार २५५ रुग्ण आहेत, तर २ हजार ११९ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्या ३ हजार ३७४ रुग्णांपैकी १ हजार ५२ रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागत आहे.
मृत्यूचे प्रमाण १.८ टक्केच...
गेल्या अनेक दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण १.९ टक्के आहे. दररोज २० ते २५ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. हे प्रमाण चिंताजनक असून, आरोग्य विभाग हे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. बुधवारच्या अहवालानुसार २० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील ११ जणांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक होते, तर नऊ जणांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी होते. यातील एकालाही कोरोनाव्यतिरिक्त कोणत्याही व्याधी नव्हत्या. मंगळवारच्या अहवालात आरोग्य विभागाने २२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. त्यात १५ जणांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक, तर ७ जणांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी होते. या अहवालातही मृत झालेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाव्यतिरिक्त आजार नसल्याचे नमूद आहे.