जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी इच्छुक मंडळींची धावाधाव सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:19 IST2020-12-29T04:19:11+5:302020-12-29T04:19:11+5:30
जळकोट : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. प्रत्येक गावातील आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र ...

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी इच्छुक मंडळींची धावाधाव सुरु
जळकोट : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. प्रत्येक गावातील आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयास प्रस्ताव दाखल केल्याची पावती जोडणे बंधनकारक केल्याने इच्छुक मंडळींची धावाधाव सुरु आहे. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव तहसील कार्यालय स्तरावर स्विकारले जावेत, अशी मागणी होत आहे.
सध्या तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे हिवाळ्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. गाव पातळीवर बैठका वाढल्या आहेत. मोर्चे बांधणी, पॅनल उभारण्यासाठी गावातील राजकीय मंडळी व्यस्त आहेत. नवखे तरुण आपला प्रभाव दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत आहे.
इच्छुक उमेदवाराने नामनिर्देशनपत्र ऑनलाईन सादर करुन त्याची प्रत तहसील कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. गावातील आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्यांना यापूर्वी तहसील कार्यालयाकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव दाखल करावे लागत होते. परंतु, यंदा ऑनलाईन प्रस्ताव दाखल केल्यानंतर सदरील प्रस्तावाची मुळ कागदपत्रे लातूरच्या जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे सादर करणे आवश्यक ठरत आहे. तिथे प्रस्ताव दाखल केल्यानंतर तेथून पोहोच पावती घेऊन ती तहसील कार्यालयाकडे सादर करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील इच्छुकांना तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत आहेत. इच्छुकांची ही अडचण दूर करण्यासाठी तहसील कार्यालयातच प्रस्ताव सादर करुन घ्यावेत, अशी मागणी होत आहे.
जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे...
तालुक्यातील डोंगरगाव, अतनूर, येलदरा, सोनवळा, एकुर्का, वडगाव, हळद वाढवणा, धामणगाव येथील इच्छुक मंडळींनी प्रस्ताव तयार करून तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी गेले होते. परंतु, तिथे सदरील प्रस्ताव स्विकारले जात नसल्याने अडचण होत आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्रासाठीचे प्रस्ताव स्विकारावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, माधवराव पाटील डोंगरगावकर, रिपाइंचे तालुकाध्यक्ष विनोद कांबळे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेतबा बेेग, माजी सरपंच संगमेश्वर बाबळसुरे, मैनुद्दीन मुंजेवार, सरपंच दाऊद बिरादार, साहेबराव पाटील, बाबासाहेब कांबळे यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कामकाज...
इच्छुकांनी प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने दाखल करावे. महा-ई- सेवा केंद्रातून पावती घेऊन ती जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयाकडे दाखल करावी. त्यानंतर तेथून पोहोच पावती आणून संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करावी, अशी सूचना अहो. हे काम ऑनलाईन होत नसल्यास त्यावर तहसीलदारांचा अभिप्राय मागितला जातो, असे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.