वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याचे विधान संभ्रमित करणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:14 IST2021-06-17T04:14:55+5:302021-06-17T04:14:55+5:30
महाविकास आघाडी सरकारचा भाग असला तरी राज्यात काँग्रेस अक्षरशः रसातळाला पोहोचली आहे. पक्षाला कुठेतरी उभारी मिळावी यासाठी बोलण्यात चतुर ...

वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याचे विधान संभ्रमित करणारे
महाविकास आघाडी सरकारचा भाग असला तरी राज्यात काँग्रेस अक्षरशः रसातळाला पोहोचली आहे. पक्षाला कुठेतरी उभारी मिळावी यासाठी बोलण्यात चतुर असलेले नाना पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देऊन अजमावण्याचा प्रयत्न केला जात आहे. पटोले यांच्या मागणीला वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर कधीही भीक घालणार नाहीत, असे सांगून जिल्हाध्यक्ष जगदीश माळी म्हणाले, लातूर जिल्ह्यात सर्व तालुका, ग्रामपंचायत स्तरावर आघाडीची संघटन बांधणी सुरू आहे. लोकांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. संघटन मजबूत करण्यासाठी निलंगा, अहमदपूर, चाकूर, लातूर, उदगीर, जळकोट, रेणापूरच्या तालुका कार्यकारिणी तयार आहेत. लातूर शहर महानगरपालिका निवडणूक तयारी म्हणून बूथबांधणी सुरू आहे. कोणत्याही क्षणी निवडणुका झाल्या तरी आमची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे सांगून लवकरच इतर पक्षांतील नेते, कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करतील, अशी माहिती त्यांनी दिली.
लातूर शहराला रोज पाणीपुरवठा करू यासह रस्ते, लाईट, ड्रेनेजसारख्या अन्य नागरी सुविधा उपलब्ध करून देऊ असे खोटे आश्वासन देऊन शहराला पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पात मुबलक पाणी असतानाही ढिसाळ नियोजन असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि सध्या सत्तेत असलेली काँग्रेस हे दोन्ही पक्ष लातूरकरांसमोर अपयशी ठरले आहेत. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत वंचित आघाडी प्रस्थापितांना आपली जागा दाखवून देईल, असा विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष जगदीश माळी यांनी व्यक्त केला.