पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:19 IST2021-09-13T04:19:32+5:302021-09-13T04:19:32+5:30
शिरूर अनंतपाळ : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ४५० हेक्टर्सवरील ऊस भुईसपाट झाला असून, अनेक ...

पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी
शिरूर अनंतपाळ : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ४५० हेक्टर्सवरील ऊस भुईसपाट झाला असून, अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात घरणी, साकोळ, पांढरवाडी, प्रकल्प आणि डोंगरगाव, हालकीसारखे बंधारे यामुळे तालुक्यात त्रिकोणी ग्रीनबेल्ट निर्माण झाला आहे. मागील वर्षी हे सर्व प्रकल्प शंभर टक्के भरले होते. त्यामुळे अनेक गावातील शेतकऱ्यांनी २ हजार ५०० हेक्टर्समध्ये नवीन ऊसाची लागवड केली आहे. तर ७०० हेक्टर्स खोडवा असा एकंदर ३ हजार २०० हेक्टर्समध्ये ऊसाचे क्षेत्र आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीच्या तारखा आहेत. परंतु नुकत्याच वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावातील शेतकऱ्यांचा ऊस भुईसपाट झाला असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भुईसपाट झालेल्या ऊसाची मशागत कशी करायची असा प्रश्न पडला आहे.
सर्वाधिक नुकसान या गावात...
तालुक्यातील सर्वच गावात कमी अधिक प्रमाणात ऊस असला तरी दैठणा, शेंद, तिपराळ, कानेगाव, साकोळ, तळेगाव, सांगवी घुग्गी, अंकुलगाराणी, उजेड, डोंगरगाव, हालकी, पांढरवाडी, धामणगाव, बोळेगाव, येरोळ, सुमठाणा, डिगोळ, चामरगा , नागेवाडी, कारेवाडी, लक्कडजवळगा, जोगाळा, शिवपूर, थेरगाव, हिप्पळगाव, कांबळगा, शिरूर अनंतपाळ या गावातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ऊस उत्पादनाच्या टनेजमध्ये घट होणार आहे. त्याचबरोबर ऊसतोड कामगार ऊसाची तोडणी करताना शेतकऱ्यांची अडवणूक करणार त्यामुळे शेतकऱ्याचे दुहेरी नुकसान झाले आहे.
हेक्टरी २५ हजारांची मागणी ...
अनेक शेतकऱ्यांनी इतर कोणतीही पिके न घेता केवळ ऊसाची लागवड केली आहे. परंतु नुकत्याच वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील ४५० हेक्टर्स ऊस भुईसपाट झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. म्हणून हेक्टरी २५ हजारांची मदत देण्यात यावी अशी मागणी व्यंकटराव पाटील, धोंडीराम कारभारी, विठ्ठलराव पाटील, संजीव गुणाले, कल्याणराव बिरादार, भाऊराव पाटील यांनी केली आहे.