भाजपच्या वतीने काेरोना योद्ध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:16 IST2021-06-02T04:16:35+5:302021-06-02T04:16:35+5:30
खरीप हंगामाच्या शेतीकामांना वेग लातूर : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, शेतकऱ्यांच्या वतीने मशागतीची कामे केली जात ...

भाजपच्या वतीने काेरोना योद्ध्यांचा सत्कार
खरीप हंगामाच्या शेतीकामांना वेग
लातूर : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, शेतकऱ्यांच्या वतीने मशागतीची कामे केली जात आहेत. तसेच बियाणे, खतांचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात ५ लाख ९३ हजार हेक्टरवर खरिपाचा पेरा अपेक्षित असून, सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना पेरणीविषयी मार्गदर्शन केले जात आहे. बियाणांची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे नियोजन कोलमडले
लातूर : पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे नियोजन कोलमडले आहे. पेट्रोल १०० रुपये, तर डिझेल ९० रुपयांच्या पुढे सरकले आहे. दरम्यान, डिझेलच्या दरवाढीमुळे शेतीच्या मशागतीच्या दरातही वाढ झाली आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सर्वांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यातच महागाईने सर्वसामान्यांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. शासनाने तत्काळ दरवाढ कमी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
बँकांनी कर्जपुरवठा करण्याची मागणी
लातूर : खरीप हंगामामध्ये शेती मशागतीसह बियाणे, खते आदी खरेदीसाठी पैशांची गरज असते. कोरोनामुळे शेतीमालाला बाजारपेठ न मिळाल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बँकानी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा बहुतांश शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे जे शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत त्यांना तरी बँकांनी तत्काळ कर्जपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा
लातूर : जिल्ह्यातील १११ गावांत पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या वतीने अधिग्रहणासाठी पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. काही प्रस्तावांना उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे. सध्या २२ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, अधिग्रहणाच्या उर्वरित प्रस्तांवाना तत्काळ मंजुरी देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
मालवाहतूक उपक्रमाला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद
लातूर : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आर्थिक उत्पन्न वाढीसाठी एसटीची मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाला जिल्ह्यातील व्यापारी, शेतकऱ्यांच्या वतीने चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक शेतकरी आपला शेतीमाल एसटीच्या मालवाहतूक ट्रकद्वारे विक्रीसाठी नेत आहेत. दरम्यान, गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत मालवाहतुकीच्या माध्यमातून लातूर विभागाला पावणेदोन काेटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले असल्याचे सांगण्यात आले.
विजेच्या लपंडावामुळे नागरिकांची गैरसोय
लातूर : शहरानजीक असलेल्या हरंगुळ नवीन वसाहत परिसरातील सदाशिव नगर, गोविंद नगर भागात सोमवारी रात्री ९ वाजेपासून वीज गुल होती. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. दरम्यान, महावितरणच्या वतीने लवकर वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नियमित वीजबिल भरूनही वीजपुरवठा खंडित केला जात असल्याची ओरड आहे. विशेष म्हणजे महावितरणशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोनही घेत नसल्याचे चित्र आहे. याकडे महावितरणने तत्काळ लक्ष देऊन गैरसोय दूर करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.