सर्वपक्षीय ओबीसींचा लातुरात जागर मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST2021-07-20T04:15:09+5:302021-07-20T04:15:09+5:30
लातूर : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण स्थगित झाले आहे. याचा फटका समाजातील ५६ हजार लोकप्रतिनिधींना बसणार आहे. त्यामुळे ओबीसी ...

सर्वपक्षीय ओबीसींचा लातुरात जागर मेळावा
लातूर : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण स्थगित झाले आहे. याचा फटका समाजातील ५६ हजार लोकप्रतिनिधींना बसणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करावे, या मागणीसाठी ओबीसी, व्हीजेएनटी आरक्षण बचाव कृती समितीच्यावतीने २४ जुलै रोजी जागर मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आरक्षण बचाव कृती समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डाटा न्यायालयात जमा न केल्यामुळे आरक्षण रद्द झाले आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ३४ जिल्हा परिषद, नगर पंचायती व २८ हजार ग्रामपंचायतींना हा निर्णय लागू आहे. यामुळे मागील २५ वर्षांपासून मिळत असलेले आरक्षण थांबले आहे. यामुळे ५६ हजार ओबीसी प्रतिनिधींना फटका बसणार आहे. या अनुषंगाने आंदोलन उभे करण्यासाठी लातुरात २४ जुलै रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ यावेळेत सावेवाडी येथील मंगल कार्यालयात जागर मेळावा होणार आहे. या जागर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे सदस्य ॲड. आण्णाराव पाटील राहणार आहेत. मेळाव्याचे उद्घाटन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, आमदार रमेश कराड, आमदार राजेश राठोड, माजी आमदार वडकुते, व्हीजेएनटी, ओबीसी जनमोर्चाचे बाळासाहेब सानप, अनिल खरमाटे, ईश्वर बाळबुद्धे, बालाजी शिंदे, नारायण मुंडे, गोविंद चिलकुटे, औशाचे नगराध्यक्ष अफसर शेख, निलंग्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, रेणापूर नगर पंचायतीचे उपाध्यक्ष अभिषेक आकनगिरे, अहमदपूरच्या उपनगराध्यक्ष मिनाक्षी रेड्डी, बबनराव तायवाडे, भानुदास माळी, ॲड. शैलेश गोजमगुंडे, ॲड. दीपक सूळ, स्थायीचे सभापती दीपक मठपती, मकरंद सावे, आदी नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या पत्रकार परिषदेला ॲड. आण्णाराव पाटील, महापौर विक्रांत गोजमगुंडे, ॲड. गोपाळ बुरबुरे, रघुनाथ मदने, राजा मणियार, व्यंकट वाघमारे, विजयकुमार साबदे, आदी उपस्थित होते.