Killari Earthquake : २५ वर्षांत बसले भूकंपाचे ९९ धक्के, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतही घडली होती घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 11:25 IST2018-09-30T04:19:05+5:302018-09-30T11:25:44+5:30
Killari Earthquake : २००७ मध्ये सर्वाधिक १७ वेळा भूकंप

Killari Earthquake : २५ वर्षांत बसले भूकंपाचे ९९ धक्के, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतही घडली होती घटना
राजकुमार जोंधळे
लातूर : १९९३ च्या भूकंपानंतर मराठवाड्यात भूकंप कसा असतो, याची माहिती सर्वश्रुत झाली. २५ वर्षांत मराठवाड्यात भूकंपाचे ९९ धक्के बसले. त्यात सर्वाधिक २००७ मध्ये १७ वेळा भूकंप झाल्याची नोंद लातूरच्या भूकंप मापक केंद्रात झाली.
जमिनीतून आवाज आणि भूभागाला बसणारे धक्के म्हणजे भूकंप, हे किल्लारी परिसराला माहीत होते. परंतु, ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या प्रलयंकारी भूकंपाने मांडलेला विध्वंस ज्यांनी पाहिला, त्यांना नेमके काय घडले हेच कळत नव्हते. जमीन हादरली. क्षणार्धात घरे कोसळली. आकाशात मातीच्या धुळीचे लोट पसरले. त्यानंतरही भूकंपाची मालिका कैक वर्षे सुरू राहिली. त्यामुळे लातूरमध्ये शासकीय भूकंप वेधशाळा उभी राहिली. गेल्या २५ वर्षांत या वेधशाळेत ५०० किलोमीटर परिघातील ९९ धक्क्यांची नोंद झाली आहे. यामध्ये लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याला सर्वाधिक ४८ धक्के बसले. १९९९ मध्ये ११ धक्के, २००० मध्ये ५ धक्के, २००३ मध्ये ५ धक्के, २००४ मध्ये ७ धक्के, २००५ मध्ये १० धक्के, २००६ मध्ये ५ धक्के, २००८ मध्ये २ धक्के, २००९ मध्ये ७ धक्के, २०१० ते ११ मध्ये १२ धक्के, २०१२ ते १८ या कालावधीत १५ धक्क्यांची नोंद आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यापाठोपाठ मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली जिल्ह्यांनाही अलिकडे भूकंपाचे धक्के जाणवले. केवळ किल्लारी परिसरातील भूकंपाची चर्चा कानी असलेल्या नांदेड-हिंगोली जिल्ह्यालाही भूकंपाचे धक्के बसले. २००७ मध्ये नांदेड शहर आणि जिल्ह्यात १० धक्के बसले. २०१६ आणि २०१७ मध्ये हिंगोली जिल्ह्यात २ धक्के जाणवले. ३० सप्टेंबर १९९३ ते १३ सप्टेंबर २०१८ या २५ वर्षांच्या कालावधीत २००७ मध्ये सर्वाधिक १७ धक्के लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील किल्लारी-लोहारा-उमगरा परिसराला बसले. तर १९९९ साली ११ धक्के जाणवले. त्याशिवाय २००१ मध्ये केवळ १ धक्क्याची नोंद आहे. तर २००२ मध्ये २ धक्क्यांची नोंद आहे.