मांजरा प्रकल्पात ८५ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST2021-09-10T04:26:37+5:302021-09-10T04:26:37+5:30
लातूर शहरासह केज, धारुर, अंबाजोगाई, कळंब, लातूर एमआयडीसी या शहरांच्या पाणीपुरवठा मांजरा प्रकल्पावर अवलंबून आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात पाऊस ...

मांजरा प्रकल्पात ८५ टक्के पाणीसाठा
लातूर शहरासह केज, धारुर, अंबाजोगाई, कळंब, लातूर एमआयडीसी या शहरांच्या पाणीपुरवठा मांजरा प्रकल्पावर अवलंबून आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा नव्हता. मात्र, गेल्या चारच दिवसात धरण क्षेत्रात मोठा पाऊस झाल्यामुळे ८५ टक्के धरण भरले आहे. यामुळे शहरांना दिलासा मिळाला आहे.
पूर्ण संचय पातळी गाठण्यास ०.८४ मीटर शिल्लक...
धरणाची पूर्ण संचय पातळी ६४२.३७ मीटर आहे. त्यापैकी ६४१.५३ मीटर पाणीपातळी आली आहे. पूर्ण संचय पातळी येण्यासाठी आता फक्त ०.८४ मीटरची गरज आहे. धरणात असाच येवा राहिल्यास दोन दिवसांत धरण शंभर टक्के भरेल अशी शक्यता प्रकल्पावरील शाखा अभियंता शाहूराज पाटील यांनी व्यक्त केली. पूर्ण धरण भरण्यास १५ टक्के शिल्लक राहिले आहे. ८५ टक्के धरण भरले आहे.
मांजरा कालव्यांतर्गत सिंचनाची सोय...
गेल्यावर्षी जवळपास १०० टक्क्यांच्या आसपास मांजरा प्रकल्प भरला होता. त्यामुळे मांजरा कालवा समितीने उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडले होते. त्यामुळे या कालव्यांतर्गत असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे. यंदा जर धरण भरले नसते तर शेतकऱ्यांवर ऊस मोडण्याची वेळ आली असती. मात्र, सुदैवाने प्रकल्प क्षेत्रात आणि लातूर जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्यामुळे मांजरा धरण भरत आले आहे. त्यामुळे या कालव्यातूनही सिंचनासाठी पाणी मिळणार असून, गतवर्षी केलेला ऊस यंदाही राहील, यामुळे शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे.