चापोलीतील ५१ शेतकरी कर्ज मुक्तीच्या प्रतीक्षेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:24 IST2021-08-21T04:24:13+5:302021-08-21T04:24:13+5:30

चापोली : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली जात आहे. योजनेला दीड वर्ष होत आले ...

51 farmers in Chapoli waiting for debt relief! | चापोलीतील ५१ शेतकरी कर्ज मुक्तीच्या प्रतीक्षेत !

चापोलीतील ५१ शेतकरी कर्ज मुक्तीच्या प्रतीक्षेत !

चापोली : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली जात आहे. योजनेला दीड वर्ष होत आले असले तरी चापोली येथील ५१ शेतकरी कर्जमुक्ती पासून वंचित आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. त्यात २ लाख रुपयांपर्यंत थकीत असलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज या मर्यादा आणि १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ अशी कालमर्यादा ठेवण्यात आली. कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट भरणार होते. राष्ट्रीयीकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती बँका, ग्रामीण बँका, विविध सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्जाची माफी होणार होती. प्रसिद्ध झालेल्या यादीपैकी चापोलीसह परिसरातील जिल्हा मध्यवर्ती बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक यामध्ये ३९६ शेतकरी पात्र आहेत. त्यात ३४५ थकबाकीदार पात्र होते. त्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमुक्तीचे १ कोटी ५९ लाख ५७ हजार २६० रुपये जमा झाले आहेत. त्यातील ३७६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले. तर, २० शेतकऱ्यांनी केले नाही. पात्र ५१ थकबाकीदार शेतकरी हे कर्जमुक्तीसाठी पात्र असूनही अद्यापही त्यांच्या खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा झालेली नाही. २७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले असून, कर्जमुक्तीची रक्कम अद्यापपर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही.

प्रोत्साहनपर अनुदान कधी मिळणार...

राज्य शासनाने २ लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची घोषणा केली. मात्र, नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार असल्याचे घोषित केले. दीड वर्ष उलटूनही नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या चापोलीसह परिसरातील ७४५ शेतकऱ्यांच्या हातात दमडीही पडली नाही. त्यामुळे नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने ठेंगा दाखवला असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.

अजूनही कर्जमुक्ती मिळण्याची प्रतीक्षा...

कर्जमुक्ती साठी प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये नाव होते. आधार प्रमाणीकरणही केले. मात्र, राज्य शासनाकडून पीक कर्जमुक्तीची रक्कम बँक कर्ज खात्यात अद्यापही जमा झालेली नाही. कर्जमुक्तीच्या योजनेच्या घोषणेला दोन वर्षे होत आले तरीही अजून कर्जमुक्ती झालेली नाही. त्यामुळे कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत.

- बाबूराव तरगुडे, शेतकरी

Web Title: 51 farmers in Chapoli waiting for debt relief!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.