१४ हजार ६५६ व्यक्तींना केले आत्महत्येपासून परावृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST2021-09-10T04:26:55+5:302021-09-10T04:26:55+5:30
लातूर : ताण- तणाव, नैराश्य, चिंता, व्यसनाधिनतेमुळे मानसिक आघात होऊन आपली जीवनयात्रा संपविण्याच्या विचारात असलेल्यांची प्रेरणा प्रकल्पांतर्गत प्रत्यक्ष भेट ...

१४ हजार ६५६ व्यक्तींना केले आत्महत्येपासून परावृत्त
लातूर : ताण- तणाव, नैराश्य, चिंता, व्यसनाधिनतेमुळे मानसिक आघात होऊन आपली जीवनयात्रा संपविण्याच्या विचारात असलेल्यांची प्रेरणा प्रकल्पांतर्गत प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना धीर देत मानसिक स्वास्थ सुधारण्यात आले आहे. त्यामुळे अडीच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील १४ हजार ६५६ जण आत्महत्येपासून परावृत्त झाले आहेत.
लातूर जिल्ह्यात नेहमी नैसर्गिक संकट कोसळते. त्यामुळे शेतकऱ्यांत नैराश्य निर्माण होते. या नैराश्यातून काही शेतकरी दूर होतात; मात्र काही जण आपली जीवनयात्रा संपवितात. हे दुष्टचक्र रोखण्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने सन २०१५ पासून प्रेरणा प्रकल्प सुरू केला आहे. त्या अंतर्गत शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्याबरोबरच औषधोपचार देण्यात येतात, तसेच वर्षभरातून दोनदा आशा स्वयंसेविकामार्फत गृहभेटी देऊन समुपदेशन करण्यात येत आहे.
सन २०१९-२० मध्ये जिल्ह्यात ७०, सन २०२०- २१ मध्ये ४५ तर चालू वर्षातील पाच महिन्यांत १२ शेतकऱ्यांनी मृत्यूस कवटाळले आहे. दरम्यान, या प्रेरणा प्रकल्पांतर्गत सदरील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची व त्यांच्या नातेवाइकांची भेट घेऊन समुपदेशन करण्यात आले, तसेच औषधोपचार देण्यात आले. त्यामुळे सन २०१९- २० मध्ये ३ हजार ८५२, २०२०- २१ मध्ये १० हजार ५४२ तर चालू वर्षात २६२ जण आत्महत्येपासून परावृत्त झाले आहेत.
नैराश्यावेळी मानसिक आधार गरजेचा...
राष्ट्रीय गुन्हे अभिलेख संस्थेने सन २००४- १४ या कालावधीत दरवर्षी एक लाख जणांनी आत्महत्या केली असल्याचे म्हटले आहे. आत्महत्येचे दूरगामी परिणाम कुटुंब, मित्र, समाजावर होतात. तणावपूर्ण जीवनशैली, वाढती स्पर्धा, अपेक्षांचे ओझे, एकत्रित कुटुंबाची मोडतोड अशा कारणांमुळे मानसिक आधार मिळत नाही. त्यामुळे नैराश्य निर्माण होते. मनातील नकारात्मकतेची भावना टोकास जाते, तेव्हा आत्महत्या केली जाते. नैराश्य आल्यानंतर त्याचे नातेवाइकांना संकेत दिले जातात. अशावेळी मनमोकळा संवाद साधणे आवश्यक असते, तसेच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला व समुपदेशन घेतल्यास आत्महत्येसारख्या घटना रोखता येऊ शकतात.
- डॉ. आशिष चेपुरे, मनोविकार तज्ज्ञ, विभागप्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.