लातूर विभागाला १०८ कोटींचा फटका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:24 IST2021-09-15T04:24:55+5:302021-09-15T04:24:55+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्यावतीने शहरी आणि ग्रामीण भागात प्रवासी सेवा दिली जाते. मात्र, काेराेनाच्या प्रादुर्भावाने या सेवेलाच ग्रहण ...

लातूर विभागाला १०८ कोटींचा फटका !
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्यावतीने शहरी आणि ग्रामीण भागात प्रवासी सेवा दिली जाते. मात्र, काेराेनाच्या प्रादुर्भावाने या सेवेलाच ग्रहण लागले. यातून महामंडळाचे दैनंदिन उत्पन्न थांबले आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जगण्याची परवड सुरू झाली. गत ७० वर्षात असे अभूतपूर्व संकट महामंडळ आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वाट्याला आले. लातूर विभागात लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा असे पाच आगार आहेत. या आगारात जवळपास ४९० बससंख्या आहे. सध्याला टप्प्या-टप्प्याने लांबपल्ल्यासह ग्रामीण भागातील मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्यात आली आहे. सध्याला अद्यापही ग्रामीण भागातील ५० टक्के ऑपरेशन बंद आहे. एकूण बससंख्येतील १९० बसेस अद्यापही जाग्यावरच थांबून आहेत. काेराेनाच्या संकटाने महामंडळाच्या वाटचालीत अनेक अडथळे निर्माण केले आहेत. लातूर विभागाला दैनंदिन २० लाख रुपयांचा तर महिन्याला ६ काेटींचा फटका सहन करावा लागत आहे. परिणामी, गत मार्च २०२० ते ऑगस्ट २०२१ या १८ महिन्यांच्या काळात एकट्या लातूर विभागाला १०८ काेटींचा ताेटा सहन करावा लागला आहे.
डिझेलचा दर दुप्पटीवर...
जून २०२० मध्ये डिझेल प्रतिलिटर ५६ रुपयांच्या घरात हाेते. आता हेच डिझेल सध्याला ९५ रुपयांवर गेले आहे. त्या तुलनेत मात्र महामंडळाच्या प्रवासी तिकिटात भाडेवाढ झाली नाही. आहे त्या दरातच प्रवाशांना सेवा देण्याची कसरत महामंडळ प्रशासनाला करावी लागत आहे. वाढलेल्या डिझेलच्या दराचा मेळ कसा घालायचा, हा प्रश्न आता सतावत आहे. सध्याला दैनंदिन २० ते २५ लाख रुपयांचा ताेटा सहन करावा लागत आहे. अशा स्थितीत पुरेसे डिझेल मिळत नसल्याचीही तक्रार आहे. आहे त्या इंधनावर उत्पन्नाची सांगड घालण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
ग्रामीण भागातील ऑपरेशन बंद...
लातूर जिल्ह्यातील विविध मार्गावर सुरू करण्यात आलेली प्रवासी सेवा सध्या बंद करण्याची वेळ महामंडळ प्रशासनावर आली आहे. केवळ भारमान आणि डिझेलच्या खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने ५० टक्के ऑपरेशन थांबले आहे. दरराेज, ग्रामीण भागातील गावा-गावातून काही प्रवाशांचा फाेन येत आहे, की साहेब आमच्या गावाची बस कधी सुरू करता. लालपरी सुरू करण्याची तयारी आहे मात्र अर्थकारण जुळत नसल्याने नाइलाज आहे. सध्याला शाळा, महाविद्यालये आणि इतर व्यवहार पूर्णत: पूर्वपदावर आले नाहीत. यातून प्रवासी भारमान घटले आहे. परिणामी, लालपरीची कसरत आणि परवड सुरूच आहे.
- सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक, लातूर
डिझेलचा तुटवडा कायम...
लातूर विभागासाठी लागणाऱ्या डिझेलचा पुरवठा करण्यात महामंडळाला अडचणी येत आहेत. सध्याला राज्यभरातच डिझेलचा तुटवडा आहे. हा प्रश्न गत काही महिन्यांपासून कायम आहे. ५६ रुपयांचे प्रतिलिटर डिझेल आता ९५ रुपयांवर गेल्याने यासाठी लागणारा निधी दुपटीवर गेला आहे. त्यातच दैनंदिन कारभारासाठी लागणाऱ्या निधीचीही माेठ्या प्रमाणावर तुट आहे. यातून लालपरी रिकामी धावण्याला ब्रेक लागला आहे. ज्या मार्गावर प्रवासी त्याच मार्गावर लालपरी सुसाट आहे. लातूर विभागालाही डिझेलअभावी अनेक बसफेऱ्या बंद कराव्या लागल्या आहेत.