यूथ बँकेला महाराष्ट्रात उच्चांकी ६.३५ कोटी नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:26 IST2021-09-26T04:26:03+5:302021-09-26T04:26:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रिझर्व्ह बँकेचे निर्बंध उठून सक्षमपणे वाटचाल करणारी यूथ डेव्हलपमेंट बँक ही पहिली आहे. बदलत्या ...

यूथ बँकेला महाराष्ट्रात उच्चांकी ६.३५ कोटी नफा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : रिझर्व्ह बँकेचे निर्बंध उठून सक्षमपणे वाटचाल करणारी यूथ डेव्हलपमेंट बँक ही पहिली आहे. बदलत्या बँकिंग प्रणालीचा वापर करून काम केल्यास अडचणीतील बँकही सक्षम कशी होते, याचे हे उदाहरण असून त्यामुळेच ११४ कोटींची मालमत्ता (असेट) असलेल्या बँकांमध्ये महाराष्ट्रात उच्चांकी ६ कोटी ३५ लाखांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेचे तज्ज्ञ संचालक चेतन नरके यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
बँकेची ४५वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन झाली. त्यानंतर ते बोलत हाेते. चेतन नरके म्हणाले, कर्जवसुली थकल्याने रिझर्व्ह बँकेने यूथ बँकेवर निर्बंध आणले होते. व्यवहार ठप्प झाले तरी एकही ठेवीदार बँकेच्या दारात आला नाही. ज्येष्ठ नेते अरुण नरके यांच्यावर असणाऱ्या विश्वासामुळे ठेवीदारांसह सगळ्यांनीच सहकार्य केले. त्यामुळे नेटाने वसुलीचे काम करून बँकेला पूर्वपदावर आणू शकलो. निर्बंध उठून कामकाज सुरू झाले असले तरी बदलत्या बँकिंग प्रणालीचा पूर्ण वापर करून व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न केले आहेत. कोरोनाची महामारी असतानाही भाग भांडवलात वाढ झाली. निर्बंध उठवल्यानंतर कर्जवाटपास गती आली असून आता २८ कोटींपर्यंत कर्जवाटप गेले आहे. व्यावसायिक दृष्टीने बँका चालविल्या तर रिझर्व्ह बँक सहकाराला सहकार्य करते, असेही नरके यांनी सांगितले.
नुसते कर्ज नव्हे, व्यवसायवृद्धीचा सल्लाही
यूथ बँकही बहुजन समाजाची आहे, येथे छोटे-छोटे कर्जदार आहेत. कर्ज देताना त्याच्या परतफेडीची क्षमता पाहिली जाते, त्याचबरोबर तो ज्या व्यवसायासाठी कर्ज काढत आहेत, त्याच्या वृद्धीसाठीही सल्ला दिला जातो, असे नरके यांनी सांगितले.
मार्च २०२५ ला ५०० कोटींच्या ठेवी
बँकेच्या सध्या १३ शाखा कार्यरत असून ७४ कोटींच्या ठेवी आहेत. अद्यापही नऊ काेटी संचित तोटा आहे. तो कमी करून २०२५ पर्यंत ५०० कोटींच्या ठेवी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी रोज १० किलोमीटर पळावे लागले तरी ते करणार असल्याचे नरके यांनी सांगितले.
यामुळे उच्चांकी नफा
कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून त्यांचा पूर्ण क्षमतेने वापर
सरकारी रोख्यांतील गुंतवणूक जोखीम न घेता
डिजिटल मार्केटिंगचा वापर करून व्यवसायवृद्धी
भीडभाड न ठेवता वसुली केल्याने एनपीए शून्य.