कोल्हापूर : दहावीच्या परीक्षेत क्रीडा गुण देताना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोल्हापूर विभागातील जिल्हा व विभागावर खेळलेल्या विद्यार्थ्यांना सरसकट गुण दिल्याने विभाग पातळीवर खेळलेल्या २७८ विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. याबाबतची तक्रार शाळांसह विद्यार्थ्यांनी केल्यानंतर आता बोर्डाने ही चूक मान्य करत या विद्यार्थ्यांना वाढीव गुणांसह सुधारित गुणपत्रिका देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.कोल्हापूर विभागीय मंडळात २ हजार ३२७ शाळा असून, ३५७ परीक्षा केंद्रांवर १ लाख २९ हजार ४२१ पैकी १ लाख २५ हजार ३८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील ४ हजार ४०० विद्यार्थ्यांनी क्रीडा गुण मिळण्यासाठी अर्ज केले होते. यामध्ये जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर खेळलेल्या खेळाडूंचा समावेश होता. जिल्हापातळीवर खेळणाऱ्या विद्यार्थ्याला पाच, तर विभाग व राज्यपातळीवर खेळलेल्या विद्यार्थ्यांना दहा ते बारा गुण व राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या विद्यार्थ्यांना पंधरा ते वीस गुण दिले जातात. दहावी परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये २७८ विद्यार्थी हे विभाग पातळीवर खेळले आहेत. तशी प्रमाणपत्रेही या विद्यार्थ्यांनी क्रीडा गुण मिळण्यासाठी केलेल्या अर्जासोबत जोडली आहेत. मात्र, बोर्डाने या सर्वच विद्यार्थ्यांना सरसकट पाच गुण दिल्याचे विद्यार्थी व शाळांच्या लक्षात आले. त्यांनी बोर्डाकडे तक्रार केल्यानंतर आता गुणपत्रिका बदलून देण्याची तयारी बोर्डाने दाखवली आहे.
विभाग पातळीवर खेळलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हापातळीवर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांइतके गुण दिले गेले आहेत. ही तांत्रिक चूक असून, आम्ही ती सुधारत आहोत. या विद्यार्थ्यांना आवश्यक गुण देत गुणपत्रिका सुधारित देण्याची प्रक्रिया सुरू आहे. - सुभाष चौगुले, सचिव, कोल्हापूर विभागीय मंडळ