एसटीची चाके गतिमान, प्रवाशांचाही सकारात्मक प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:15 IST2021-07-09T04:15:50+5:302021-07-09T04:15:50+5:30

कोल्हापूर : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर राज्य शासनाने एस. टी. बसेसवरही कडक निर्बंध घातले. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता ...

The wheels of the ST are moving, and the passengers are responding positively | एसटीची चाके गतिमान, प्रवाशांचाही सकारात्मक प्रतिसाद

एसटीची चाके गतिमान, प्रवाशांचाही सकारात्मक प्रतिसाद

कोल्हापूर : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर राज्य शासनाने एस. टी. बसेसवरही कडक निर्बंध घातले. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य प्रवाशांवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, संसर्गाचा कहर कमी आल्यानंतर सर्वच मार्गावरील प्रवासी वाहतूक सुुरू करण्यात आली आहे. प्रवाशांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. महामंडळाने ७०० पैकी ४५० बसेस रस्त्यावर उतरविल्या असून १३०० हून अधिक फेऱ्या होऊ लागल्या आहेत. त्यामुळे उत्पन्नातही भर पडू लागली आहे.

कोरोना संसर्गाचा दुसऱ्या लाटेनंतर राज्य शासनाने सर्वत्र कडक निर्बंध लादले होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याव्यतिरिक्त अन्य प्र‌वाशांना प्रवास करण्यास मुभा दिली नाही. त्याचा परिणाम म्हणून एस.टी. महामंडळाच्या कोल्हापूर विभागाचे सुमारे दिवसाकाठी १५ लाखांचे उत्पन्न बुडाले होते. अत्यावश्यक सेवेतील रस्त्यावर उतरविण्यात आलेल्या बसेसचा इंधनाचाही खर्च निघाला नाही. काहीअंशी निर्बंध शिथिल केल्यानंतर हळूहळू एस.टी.ची चाके पूर्वपदावर येऊ लागली आहेत. जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील अंतर्गत ग्रामीण भागातही सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. काही ठिकाणी प्रवाशांचा प्रतिसाद उदंड, तर काही ठिकाणी अजूनही संसर्गाचा प्रादुर्भाव असल्यामुळे एस.टी.बसेसला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. मुंबईलाही जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे मार्गावर रोज पन्नासहून अधिक बसेस सोडल्या जात आहेत. तर कर्नाटक, पणजी (गोवा) परराज्यांच्या मार्गावरील बसेस अजूनही बंद आहेत. तर कर्नाटकातूनही कर्नाटक महामंडळाच्या बसेसनाही कोल्हापुरात प्रवेशास बंदी आहे. तर एस.टी.महामंडळाच्या बसेसनाही प्रवाशांनी आरटीपीसीआर केल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही.

पुन्हा जोर वाढला

जिल्ह्यातील एकूण आगार - १२

एकूण बसेस -७००

सध्या सुरू असलेल्या बसेस - ४५०

रोज एकूण फेऱ्या - १३००

तोटा वाढला

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्य शासनाने पहिल्या काही दिवसांत सात दिवसांचा कडक लाॅकडाऊन जाहीर केला. त्यानंतर एस.टी. बसेसची सेवाही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता सुरू ठेवली. यात सर्वसामान्यांना प्रवासास बंदी घालण्यात आली. त्यामुळे कोल्हापूर विभागाला सुमारे रोज १५ लाखांचा तोटा झाला. मात्र, हा तोटा सध्या भरून काढण्याचे काम सुरू झाले आहे. ज्या गावांमध्ये एस.टी. बसेसची सेवा बंद करण्यात आली होती, ती पूर्ववत करण्याचे काम सुरू झाले आहे. प्रवाशांचाही सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.

दुसऱ्या राज्यातील बसेस अजूनही बंदच

कर्नाटकातून येणाऱ्या कर्नाटक महामंडळाचा बसेस कोल्हापुरात येत नाहीत. तर एस.टी. महामंडळाच्या कोल्हापूर विभागाचे बसेस निपाणी, संकेश्वर, बेळगाव, हुबळी, धारवाड आदी ठिकाणी जात नाहीत. दोन्ही बाजूंनी तपासणी नाक्यांवर प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केल्याशिवाय राज्यांच्या हद्दीत प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे कर्नाटकसह गोवा राज्यातून येणाऱ्या कदबाच्या बसेसही बंद आहेत.

बंद फेऱ्या पुन्हा सुरू

बारा तालुक्यांतील सर्वच अंतर्गत ग्रामीण गावे पुन्हा एस.टी. बसेसनी जोडली गेली आहेत. त्यामुळे आजरा, चंदगड, शाहूवाडी, मुरगुड, गारगोटी, राधानगरी आदी भागातील अंतर्गत गावांमध्ये पुन्हा एस.टी.ची सेवा पूर्ववत होऊ लागली आहे. बसेस तुडुंब भरत नसल्या तरी नियमित प्रवाशांचा प्रतिसाद लाभत आहे. यापूर्वी केवळ तालुकास्तरावरच बससेवा सुरू होती. दररोज १३०० फेऱ्या होत आहेत.

मुंबई, पुणे मार्गावरही सकारात्मक प्रतिसाद

देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही राज्य शासनाने कडक निर्बंध घातले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांसह सरकारी कामाकरिता जाणाऱ्या प्रवाशांनीही मुंबई, पुणेकडे पाठ फिरवली होती. या भागातील कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाने तेथीलही निर्बंध शिथिल केले. त्यामुळे तेथील व्यावसायिकांनी आपल्या आस्थापना सुरू केल्या आहेत. त्यामुळे कोल्हापुरातून जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे दिवसभरात कोल्हापुरातील विविध आगारांतून ५० बसेस या मार्गावर सोडल्या जातात. विशेष म्हणजे केवळ एकच रेल्वे मुंबई मार्गावर सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचा ओढा एक तर खासगी किंवा एस.टी.च्या बसेसकडे वाढला आहे.

Web Title: The wheels of the ST are moving, and the passengers are responding positively