सोमवारपासून दोन दिवस पाणीपुरवठा बंद
By Admin | Updated: June 11, 2016 00:29 IST2016-06-11T00:10:36+5:302016-06-11T00:29:31+5:30
चंबुखडी पाण्याच्या टाकीपर्यंतच्या ७५० मि.मी. व्यासाच्या दाब नलिकेवरील गळती काढण्याचे काम सोमवारी सुरू करण्यात येत आहे.

सोमवारपासून दोन दिवस पाणीपुरवठा बंद
कोल्हापूर : बालिंगा जलशुद्धिकरण केंद्र ते चंबुखडी या दरम्यानच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार असल्यामुळे बहुतांश भागांत सोमवार (दि. १३) पासून दोन दिवस पाणीपुरवठा होणार नाही; तर काही भागांत अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. दोन दिवस पाणीपुरवठा न झाल्यामुळे टंचाईसदृश परिस्थिती जाणवल्यास त्या भागात टँकरने पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे जाहीर केले आहे. भोगावती नदीतून बालिंगा येथून पाणी उपसा करून ते गावातील जलशुद्धिकरण केंद्रात टाकण्यात येते. तेथून शुद्धिकरण करून चंबुखडी टाकीत टाकून तेथून वितरण शहराच्या ए, बी, सी, डी आणि ई वॉर्डांतील काही भागांत वितरित होते; पण बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रापासून चंबुखडी पाण्याच्या टाकीपर्यंतच्या ७५० मि.मी. व्यासाच्या दाब नलिकेवरील गळती काढण्याचे काम सोमवारी सुरू करण्यात येत आहे.
यामुळे सोमवारी सकाळी काही भागांत पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे; पण नंतर ही जलवाहिनी रिकामी करून ती दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ए, बी वॉर्डांतील आपटेनगर, बालिंगा जलउपसा केंद्रांवर व चंबुखडी टाकीवर अवलंबून असलेल्या शिवाजी पेठ, मंगळवार पेठ परिसर, रंकाळा परिसर, फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत तसेच संपूर्ण सी व डी वॉर्ड तसेच ई वॉर्डातील शाहूपुरीमधील काही भाग, शिवाजी उद्यमनगर परिसर, या भागांत दोन दिवस पाणीपुरवठा होणार नाही.
टँकरने पाणीपुरवठा
ज्या भागात पाणीटंचाई जाणवेल, त्या भागात महापालिकेच्या आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याशिवाय गरज लागल्यास खासगी टँकरद्वारेही पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
येथे पाणीपुरवठा नाही
ए, बी वॉर्ड : संपूर्ण शिवाजी पेठ, मंगळवार पेठ परिसर, रंकाळा, फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत
संपूर्ण सी आणि डी वॉर्ड.
ई वॉर्ड : शाहूपुरीमधील काही भाग, शिवाजी उद्यमनगर परिसर