विनय कोरे, चंद्रदीप नरके यांचे तालुक्यात वर्चस्व पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:27 IST2019-04-05T00:27:05+5:302019-04-05T00:27:10+5:30
नितीन भगवान । लोकमत न्यूज नेटवर्क पन्हाळा : पन्हाळा तालुक्यात लोकसभा निवडणुकीचे कोणतेच पडघम वाजत नसल्याने निवडणूक आहे की ...

विनय कोरे, चंद्रदीप नरके यांचे तालुक्यात वर्चस्व पणाला
नितीन भगवान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पन्हाळा : पन्हाळा तालुक्यात लोकसभा निवडणुकीचे कोणतेच पडघम वाजत नसल्याने निवडणूक आहे की नाही असे वातावरण असून, तालुक्यात सर्व काही शांत शांत आहे.
गतवेळच्या लोकसभा निवडणुकीत पन्हाळा तालुक्यातील पूर्व भागात खासदार राजू शेट्टी यांनी ४० हजारांचे मताधिक्य मिळविलेले होते. यावेळी मात्र ही मते मिळतीलच याची खात्री त्यांना देता येत नाही, तर तालुक्याच्या पश्चिम भागात धनंजय महाडिक विरुद्ध प्रा. संजय मंडलिक असाच गत लोकसभेचा सामना असून, या ठिकाणी गेल्या वेळी धनंजय महाडिक यांनी नऊ हजार मताधिक्य घेतले होते. या ठिकाणीही महाडिक यांना हे मताधिक्य टिकविता येईल का, याबाबत लोकांमध्ये चर्चा आहे.
पन्हाळा तालुक्याचे लोकसभा व विधानसभा मतदारसंघासाठी विभाजन झाले असून, पूर्व भागात हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी ६७ गावे गेली असून, या ठिकाणी १ लाख ३५ हजार २४२, तर पश्चिम भागात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ येत असून, यात ६६ गावांचे ७० हजार ४२६ इतके मतदार आहेत.
तालुक्याच्या पूर्व भागावर ‘जनसुराज्य’चे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांचे वर्चस्व असून, पश्चिम भागावर आ. चंद्रदीप नरके यांचे वर्चस्व आहे. विनय कोरे आणि राजू शेट्टी यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य सर्वश्रुत असल्याने होणारे मतदान शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्याकडे वळणार की यावेळी मतदार वैयक्तिक निर्णय घेत मतदान करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. बदलत्या राजकीय साठमारीत विनय कोरे यांची मात्र राजकीय कोंडी झाली आहे.
पूर्व भागातील शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात विविध गटांचे प्राबल्य अधिक आहे. विद्यमान आमदार सत्यजित पाटील (शिवसेना), विनय कोरे (जनसुराज्य), कर्णसिंह गायकवाड व अमरसिंह पाटील (काँग्रेस), मानसिंग गायकवाड व बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी) हे गट प्रमुख आहेत, तर याव्यतिरिक्त शेकाप व अन्य दलित संघटना असे राजकीय समीकरण आहे. जनसुराज्य पक्ष युतीचा सहयोगी पक्ष आहे, तर धैर्यशील माने शिवसेनेचे उमेदवार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षानेही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे मानसिंग गायकवाड, अमर पाटील, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब पाटील हे आघाडी धर्म पाळणार की सोयीची भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
२०१४ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत ४० हजारांवर मताधिक्य घेत खा. राजू शेट्टी यांनी पन्हाळा तालुक्याकडे मागे वळून बघितलेले नाही की सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळलेले नाहीत. दहा वर्षांच्या कालखंडात त्यांनी अपवाद वगळता प्रभावी काम केलेले नाही, अशी चर्चा आहे. या गोष्टींचा विचार करता व प्रमुख नेते विरोधात असल्याने शेट्टी यांची मतदारसंघात सत्त्वपरीक्षा आहे. युतीचे उमेदवार माने हे नवखे असले तरी कै. बाळासाहेब माने व माजी खासदार निवेदिता माने यांच्या पाठबळाच्या शिदोरीवर व अभ्यासू नेतृत्वाच्या बळावर आव्हान निर्माण करू शकतात.
या निवडणुकीत खा. शेट्टींसमोर दोनवेळचे मताधिक्य राखण्याचे,
तर धैर्यशील माने यांच्यासमोर पूर्वाश्रमीचे आजोबा व आई यांचे खासदारकीचे स्वप्न साकारण्याचे आव्हान असेल. दरम्यान, मंत्री सदाभाऊ खोत यांनाच उमेदवारी मिळणार असे वाटत असतानाच नाट्यमय वळणात धैर्यशील माने यांचा शिवसेना प्रवेश व मिळालेली उमेदवारी डॉ. कोरेंना डोकेदुखी ठरली आहे. परिणामी, कोरेंची राजकीय कोंडी झाल्याचे स्पष्ट होत आहे. पश्चिम भागात आ. चंद्रदीप नरके यांचे प्राबल्य असले तरी गत निवडणुकीत आताचेच उमेदवार होते. यात महाडिक यांना नऊ हजार मताधिक्य मिळाले होते. पाच वर्षे खा. महाडिक पश्चिम पन्हाळ्याच्या भेटीला आले नाहीत की तेथील मतदारांच्या भावना जाणून घेतल्या नाहीत, अशी चर्चा आहे. पन्हाळा तालुक्याचे लोकसभा व विधानसभा मतदारसंघात झालेले विभाजन या कारणाने कोणतेच खासदार, आमदार लक्ष देत नसल्याने तालुक्याचा विकास जैसे थे आहे.