परीक्षेबाबतच्या निर्णयाकडे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या नजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:24 IST2021-05-24T04:24:05+5:302021-05-24T04:24:05+5:30
यावर्षीच्या सीबीएसई बारावीच्या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ५५० विद्यार्थ्यांनी, तर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेसाठी कोल्हापूर, सांगली, ...

परीक्षेबाबतच्या निर्णयाकडे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या नजरा
यावर्षीच्या सीबीएसई बारावीच्या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ५५० विद्यार्थ्यांनी, तर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील एकूण एक लाख २३ हजार ५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दरवर्षी फेब्रुवारी, मार्च दरम्यान परीक्षा होऊन त्यांचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतो. मात्र, यंदा कोरोनामुळे सीबीएसई आणि राज्य शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा रद्द केली; पण बारावीची परीक्षा घेण्याचे गेल्या महिन्यात जाहीर केले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत अंतिम निर्णय सरकारने घेतलेला नाही. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी रविवारी या परीक्षेबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यामध्ये महत्त्वाच्या विषयाची परीक्षा घेणे अथवा परीक्षेचे स्वरूप बदलणे असे दोन पर्याय सांगितले आहेत. त्यावर राज्यांनी मंगळवार (दि. २५)पर्यंत सूचना सादर करण्यास त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर पुढील निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले आहे. परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत येत्या दोन दिवसांत चर्चा करणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयाकडे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या नजरा लागल्या आहेत.