तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा : घैसास
By Admin | Updated: June 30, 2014 00:43 IST2014-06-30T00:42:10+5:302014-06-30T00:43:21+5:30
चित्पावन संघ सुवर्णमहोत्सवाची सांगता : आदेश गोखले यांनी दिला मूलमंत्र

तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा : घैसास
कोल्हापूर : माहिती व तंत्रज्ञान जर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले, तरच लोकांची प्रगती होईल. नोकरीनिमित्त खेड्याकडून शहराकडे येणारा लोकांचा लोंढाही थांबेल. तंत्रज्ञान केवळ शहरापुरतेच मर्यादित राहिले आहे. ते सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्याचे मत जीनव्होकल गु्रपचे अध्यक्ष दीपक घैसास यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर चित्पावन संघाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित ‘युवकांना नोकरी, व्यवसायासाठी संधी’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परषिदेचे अध्यक्ष उमेश आपटे होते.
घैसास म्हणाले, खेड्यात राहूनही आपला उत्कर्ष युवकांना करता येतो. यासाठी आजचे तंत्रज्ञान शिकणे गरजेचे आहे. मला कळत नाही, अशी मानसिकता खेड्यातील सर्वसामान्यांनी व शेतकऱ्यांनी बदलली पाहिजे. मोबाईलद्वारे शेतीपंपही घरबसल्या चालू करता येतात. हा तंत्रज्ञानातील बदलही आपण स्वीकारला पाहिजे. सध्या माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात भरपूर संधी असून, २५ ते ५५ या वयोगटांतील तरुण म्हणणाऱ्या युवकांना मोठी संधी आहे. खऱ्या अर्थाने देशातील बहुसंख्य लोकसंख्या खेड्यांत आहे. हे नागरिक नोकरीनिमित्त शहराकडे येत आहेत. त्यांना त्यांच्या गावातही रोजगार उपलब्ध होऊ शकतो. असाच प्रयोग सध्या कोकणातही केल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले. त्यांनी कोकणात पर्यटन मार्गदर्शक (टुरिस्ट गाईड) मिळत नाहीत. याकरिता १२ वी नापास ही शैक्षणिक पात्रता ठेवून गाईडचा कोर्स सुरू केला. यामध्ये आम्हाला यश आले. आज या कोर्समधील तिसरी बॅच बाहेर पडली आहे. याचबरोबर गावातील वृद्ध आजी-आजोबांना घरात कोणी नसेल तर ‘एसएमएस’द्वारे संदेश देऊन औषधांची आठवण करणारी सेवा उपलब्ध करू शकतो. याचबरोबर जेवणाचे डबेही पोहोच करून व्यवसाय करू शकतो. शिक्षण पद्धतीमध्ये व्यावसायिकतेचा आधार घ्यावा लागणार आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षणही महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. हा बदल आपल्यामध्ये केला तर आपल्याला बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. गावातच आपल्याला रोजगार उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले. ए.एम.एस. सर्व्हिस व आयबीएम इंडियाचे संचालक आदेश गोखले यांनीही माहिती तंत्रज्ञानातील पूरक अशी
माहिती उपस्थितांना दिली. यावेळी सर्व तंत्रज्ञान शिकण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त
केले. यावेळी कोल्हापूर चित्पावन संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गद्रे, कार्याध्यक्ष प्रसाद भिडे, नंदकुमार मराठे, दत्तात्रय कानिटकर, मकरंद करंदीकर, केदार जोशी, संगीता आपटे, किरण जोशी, विष्णू जोशी, विठ्ठल नरवणे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)