भाजपची फसवेगिरी घराघरांत पोहोचवा : सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 17:34 IST2017-09-23T17:31:56+5:302017-09-23T17:34:43+5:30
जनतेला खोटी आश्वासने देऊन राज्यात आणि देशात सत्तेवर आलेल्या भाजपकडून अच्छे दिन आले नाहीतच; उलट महागाईचे दिवस आले आहेत. त्यामुळे भाजपची ही फसवेगिरी घराघरांत पोहोचवा, असे आवाहन माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी कोल्हापूर महानगरपालिकेतील कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस नगरसेवकांच्या मेळाव्यात बोलताना केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महापौर हसिना फरास होत्या.

कोल्हापूर महानगरपालिकेतील कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी नगरसेवकांच्या मेळाव्यात बोलताना माजी मंत्री आमदार सतेज पाटील. यावेळी तौफिक मुल्लाणी, प्रवीण केसरकर, संदीप नेजदार, महापौर हसिना फरास, उपमहापौर अर्जुन माने, आर. के. पोवार, प्रा. जयंत पाटील, राजेश लाटकर उपस्थित होते.
कोल्हापूर : जनतेला खोटी आश्वासने देऊन राज्यात आणि देशात सत्तेवर आलेल्या भाजपकडून अच्छे दिन आले नाहीतच; उलट महागाईचे दिवस आले आहेत. त्यामुळे भाजपची ही फसवेगिरी घराघरांत पोहोचवा, असे आवाहन माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी कोल्हापूर महानगरपालिकेतील कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस नगरसेवकांच्या मेळाव्यात बोलताना केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महापौर हसिना फरास होत्या.
महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११, ताराबाई पार्क या मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ हा मेळावा आयोजित होता. त्यास उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती संदीप नेजदार, सभागृह नेता प्रवीण केसरकर, गटनेते शारंगधर देशमुख, सुनील पाटील, आर. के. पोवार, प्रा. जयंत पाटील उपस्थित होते.
जनतेला पेट्रोलपंपावर गेले की, भाजपच्या अच्छे दिनाची आठवण येते. अनेक खोटी आश्वासने दिली, भूलथापा मारल्या; पण जी आश्वासने दिली त्यापैकी एकही पूर्ण केले नाही. जनतेची ही फसवणूक झालेली आहे. भाजप सरकारची खोटी आश्वासने आणि फसवेगिरी महानगरपालिकेच्या निमित्ताने घराघरांत पोहोचवा, असे आमदार पाटील म्हणाले.
ताराबाई पार्क प्रभागातील पोटनिवडणूक ही संघर्षाची तसेच प्रतिष्ठेची असल्याने ती आम्ही ताकदीने लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राजेश लाटकर यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न करावेत. सभागृहातील प्रत्येक नगरसेवकाने वेळ काढून प्रचाराचे नियोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे म्हणूनच देशात एक प्रकारची लाट असताना महानगरपालिका आमच्या हाती सोपविली, उद्या राजेश लाटकरांच्या बाबतीतही जनता योग्य निर्णय घेईल आणि त्यांना विजयी करेल, असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला.
माजी महापौर आर. के. पोवार यांनी मतदारसंघातील मतदारांचे चित्र स्पष्ट केले. आम्ही सर्वजण एकदिलाने प्रचार करण्याची भूमिका घेतली असली तरी सतेज पाटील यांनी त्यांची स्वत:चीच उमेदवारी आहे, असे समजून प्रचार करावा, असे पोवार म्हणाले. प्रा. जयंत पाटील यांनी पुढचे पंधरा दिवस रोज आठ तास प्रभागात काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी वासिम मुजावर यांचा आमदार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नगरसेवक भूपाल शेटे, दुर्वास कदम यांची भाषणे झाली. सभागृह नेता प्रवीण केसरकर यांनी प्रास्ताविकात जीएसटी, रेरा, नोटाबंदीमुळे सर्वच व्यवसायात मंदी आली आहे. भाजपचे हे अच्छे दिवस जनतेला कळून चुकले आहेत. त्यामुळे महापालिकेची पोटनिवडणूक ही भाजपच्या पराभवाची सुरुवात असेल, असे सांगितले. तौफिक मुल्लाणी यांनी आभार मानले.