आदित्य वेल्हाळकोल्हापूर : वळवाचा पाऊस पडला की, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड या जंगलमय परिसरात काजव्यांचा लूकलूकाट पाहायला मिळतो. मात्र, यंदा याच काळात अवकाळी पाऊस जोरदार बरसल्याने काजव्यांचा प्रकाश अंधूक झाला. त्यामुळे यंदा नागरिकांना काजव्यांची लूकलूकणारी दुनिया पाहण्याची संधी अवकाळीने हिरावून घेतल्याचे चित्र आहे.प्रत्येक वर्षी वळीव पाऊस पडून झाल्यानंतर मान्सून पाऊस सुरू होण्याआधीच्या मधल्या काळात काजव्यांचा मिलनाचा काळ मानला जातो. काजवे हे त्याच्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी किंवा शिकारीसाठी चमकतात. याच काळात जिल्ह्यातील जंगल परिसरात काजव्यांची चमचमणारी दुनिया पाहायला मिळते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी काजवा महोत्सव भरवला जातो. तो पाहण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातील पर्यटक कोल्हापुरात येत असतात. मात्र, यंदा काजवे कमी प्रमाणात चमकल्याने पर्यटकांची निराशा झाली आहे.
रात्रचरी हेच काजवे चमकणारेजगभरात काजव्यांच्या दोन हजार प्रजाती आहेत. काजवे हिवाळा व कडक उन्हाळ्यात निद्रावस्थेत जातात. मिलनानंतर मादी जवळपास शंभर अंडी घालते. यातून बाहेर पडणाऱ्या अळ्यांना ग्लोवर्म असे संबोधले जातात. विशेष म्हणजे दिनचर व निशाचर असे काजव्यांचे दोन प्रकार आढळतात. निशाचर हेच काजवे चमकतात.
जिल्ह्यात यंदा अनेक ठिकाणी काजवे चमकले नाहीत. काही ठिकाणी काजवे चमकले, परंतु त्याचे प्रमाण कमी आहे. अवकाळी पावसामुळे काजवे मिलनासाठीची अनुकूल परिस्थिती तयार झाली नसल्याने अडथळे आले. अनुकूल परिस्थिती तयार झाली तर काजवे पुन्हा चमकतील. - डॉ. प्रकाश भोजे, विभागप्रमुख प्राणिशास्त्र, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, वारणानगर.