कळे बंधाऱ्याने गाठला साठीचा टप्पा
By Admin | Updated: June 11, 2016 00:52 IST2016-06-11T00:15:30+5:302016-06-11T00:52:00+5:30
दुरुस्तीसाठी निधीची गरज : ४० ते ५० गावांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याच्या दृष्टीने मैलाचा दगड

कळे बंधाऱ्याने गाठला साठीचा टप्पा
कळे : धामणी खोऱ्यासह पश्चिम पन्हाळ्यातील कळे परिसर व गगनबावडा तालुक्यातील साळवणपर्यंतच्या पट्ट्यात येणाऱ्या सुमारे ४० ते ५० गावांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरलेला
कळे- सावर्डे हा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा वयाची साठी ओलांडत आहे. गेल्या ६० वर्षांपासून अनेक उन्हाळे-पावसाळे पाहत, महापुरातील असह्य पाण्याचा प्रवाह सहन करीत व २०१२ सालापर्यंत वाहतुकीची सर्व मदार पेलून आता मात्र कमकुवत होऊ लागला आहे. बंधाऱ्याच्या दुरस्तीसाठी गरज आहे ती शासकीय निधीची. याकडे
शासन पाटबंधारे विभाग कितपत लक्ष देतो व लोकप्रतिनिधी
किती पाठपुरावा करतात यावरच या बंधाऱ्याचे भवितव्य अवलंबून आहे.
माजी आमदार स्व. शंकरराव देसाई (कळे) यांच्या पुढाकाराने १९५५-५६ साली बंधाऱ्याच्या बांधकामास सुरुवात झाली. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर १९५८-५९ साली प्रत्यक्षात पहिल्यांदाच पाणी अडविण्यात आले. ३३ गाळे असणाऱ्या बंधाऱ्याची उंची साधारण २० फुटावर आहे. कळे-साळवण परिसर व धामणी खोऱ्यासाठी पाणी अडविण्याबरोबरच धामणी खोऱ्यातील वाहतुकीची सर्व मदार २०१२ पर्यंत बंधाऱ्यावरच होती. २०१२ साली नवीन झालेल्या कळे-सावर्डे-मल्हारपेठ पुलामुळे बंधाऱ्यावरील वाहतुकीचा ताण पूर्णपणे कमी झाला.
सर्वांत लांब बॅकवॉटरने पाणी पुरविणारा एकमेव बंधारा
कळे-सावर्डे बंधारा व कुंभी-धामणी सहकारी धरण सोसायटीच्या मालकीचा असून, बंधाऱ्याची देखभाल व दुरस्ती धरण संस्था स्वखर्चाने पाहते. कळे-सावर्डे बंधाऱ्याला २० फुटापर्यंत पाणीपातळी ठेवून हे पाणी बॅकवॉटर पद्धतीने धामणी नदीतील आंबर्डे व कुंभी नदीतील वेतवडे (ता. गगनबावडा) बंधाऱ्यापर्यंत नेले. आंबर्डे बंधाऱ्यावर विद्युत मोटारी लावून मातीच्या बंधाऱ्यामध्ये पाणी साठवून म्हासुर्ली परिसरातील गावांनाही हे पाणी दिले जाते. एवढ्या लांब पल्ल्यापर्यंत बॅकवॉटरने पाणीपुरवठा करणारा हा जिल्ह्यातील एकमेव सहकारी तत्त्वावरील बंधारा आहे.