हल्लेखोरांना कोणीतरी संरक्षण देतय
By Admin | Updated: February 27, 2015 00:17 IST2015-02-27T00:07:49+5:302015-02-27T00:17:27+5:30
नारायण राणेंचा आरोप : पानसरे कुटुंबीयांची विचारपूस

हल्लेखोरांना कोणीतरी संरक्षण देतय
कोल्हापूर : ज्येष्ठ सामाजिक नेते अॅड. गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केलेले हल्लेखोर पोलिसांना सापडत नाहीत, यावरून हल्लेखोरांना कोणीतरी संरक्षण देत असल्याचे स्पष्ट आहे, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला.राणे यांनी गुरुवारी अडीचच्या सुमारास येथील अॅस्टर आधार हॉस्पिटलला भेट दिली. त्यांनी कुटुंबीयांकडे हल्लेखोरांच्या गोळीबारात जखमी झालेल्या अॅड. गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. डॉक्टरांनी उमा यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले. यावेळी मेघा पानसरे, विलास रणसुभे, बन्सी सातपुते उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, डॉ. दाभोलकर यांची हत्या होऊन दीड वर्ष होऊन गेले. अजूनही मारेकरी मोकाट आहेत. अॅड. पानसरे दाम्पत्याच्या हल्ल्यासंबंधी शासन गंभीर नाही. हल्लेखोरांना कोणीतरी संरक्षण देत असल्याचे माझे मत आहे. हल्लेखोरांना किती दिवसांत पकडू हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगणे अपेक्षित आहे. याकडे दुर्लक्ष करीत मुख्यमंत्री फडणवीस तपासाबाबत ठोस असे काहीही सांगायला तयार नाहीत. पानसरे यांच्यावरील हल्ला महाराष्ट्राला लाजिरवाणा प्रकार आहे. विधिमंडळात शोकप्रस्ताव मांडण्याला विरोध करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी पानसरे यांना अप्रत्यक्षपणे विरोध असल्याचे दाखवून दिले आहे.