कोल्हापूर : महामार्गांवरचा प्रवास स्वस्त, सुलभ करण्याच्या उद्देशाने येत्या १५ ऑगस्टपासून वार्षिक फास्टॅग पास सुरू करायचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. तीन हजार रुपये किमतीचा हा पास एका वर्षाच्या कालावधीसाठी किंवा २०० फेऱ्यांसाठी लागू असेल. मात्र, हा निर्णय कोल्हापूरकारंना (एमच-०९) चांगलाच फायद्याचा ठरण्याची चिन्हे आहेत. कारण येथील अनेक जणांना सतत आपल्या गाड्यातून राज्यात तसेच देशभर पर्यटनाची क्रेझ आहे. तसेच येथे उद्योजक, तसेच व्यावसायिकांचाही मोठा वर्ग असल्यांने त्यांनाही या योजनेचा फायदा होणार आहे. मात्र जी खासगी वाहने केवळ सुट्टी आणि सणाच्या कालावधीत परजिल्हा, परराज्यांत जातात. त्यांना मात्र या सवलत योजनेचा फायदा होण्याची शक्यता कमी आहे.राष्ट्रीय महामार्गावर व्यक्तिगत वापराच्या वाहनांना हा पास वापरता येणार असल्याचे धोरण आहे. साातत्यांने बाहेर पर्यटनासाठी वा इतर कारणासाठी फिरणाऱ्यांना ही एक सुवर्णसंधी आहे.मात्र, खासगी वाहने दिवाळी, मे महिन्याची सुटी, नाताळ, गणपती या कालावधीतच परजिल्हा, परराज्य आणि देशात काही धार्मिक आणि पर्यटनासाठी बाहेर पडतात. हा पास काढल्यास वर्षभरात २०० वेळा प्रवास करणे शक्य होणार नसल्याचे खासगी वाहनमालकांचे म्हणणे आहे. दरम्यान, पास काढण्यासाठीची लिंक लवकरच राजमार्ग यात्रा ॲप आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत संकेत स्थळांवर उपलब्ध करून दिला जाणार आहे.
२०० वेळा वर्षभरात प्रवास करणे ज्या कुटुंबान बाहेर प्रवास करणे शक्य नाही त्या खासगी वाहनचालकांना मात्र ही योजना जादा फायद्याची ठरणार नाही.
खासगी वाहनांसह ओला, उबेरसह काळी पिवळी टॅक्सीचा या योजनेत समावेश करावा. कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत हा महत्त्वाचा घटक आहे. रोज पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या टॅक्सी आहेत. त्यांना या निर्णयाचा फायदा होऊ शकेल. - सुभाष जाधव, अध्यक्ष जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन
आम्ही फक्त गणपती सण आणि सुटीसाठी कालावधीसाठी कोकणात जातो. त्यामुळे या निर्णयाचा लाभ होईल, असे वाटत नाही. गणपतीच्या काळात तर कोकणवासीयांना टोल माफी दिली जाते. तीन हजारांत वर्षभराच्या फास्टँगचा फायदा होणार नाही. - सूरज मयेकर, निवती, कोकण
पाल्यांना भेटी, दवाखाना, शिक्षणासाठी पुणे आणि मुंबईपर्यंत प्रवास होतो. मात्र, हा महिन्यातून पाच वेळा जरी हा प्रवास झाला तरी वर्षातून ६० वेळा प्रवास होतो. सातत्याने प्रवास झाल्यास हा पास काही जणांना उपयोगी पडू शकेल. - राजन चव्हाण, इचलकरंजी
ट्रान्स्पोर्टच्या वाहनांचा देशभर प्रवास सुरू असतो. त्यात काही वाहनचालक रोज राष्ट्रीय महामार्गावर असतात. सेव्हन सीटर क्षमता असलेल्या ट्रान्स्पोर्टच्या वाहनांना हा पास देणे गरजेचे आहे. कारण सर्वांधिक वाहतूक पिवळ्या रंगाच्या नंबरप्लेट असलेली वाहने करतात. त्यांचाही नव्या धोरणात विचार करावा. - गणेश पाटील, वाहतूक व्यावसायिक