कोल्हापुरातील गिर्यारोहकाचा चटका लावणारा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST2021-02-16T04:26:05+5:302021-02-16T04:26:05+5:30
कोल्हापूर : येथील गिर्यारोहकाचा रविवारी मनाला चटका लावणारा मृत्यू झाला. श्रीपाद ऊर्फ मनीष हणमंत जोशी, वंदूरकर (वय ३८), असे ...

कोल्हापुरातील गिर्यारोहकाचा चटका लावणारा मृत्यू
कोल्हापूर : येथील गिर्यारोहकाचा रविवारी मनाला चटका लावणारा मृत्यू झाला. श्रीपाद ऊर्फ मनीष हणमंत जोशी, वंदूरकर (वय ३८), असे त्यांचे नाव आहे. त्र्यंबकेश्वर-नाशिक येथील ब्रह्मगिरी पर्वताची मोहीम पूर्ण झाल्यानंतर माघारी येत असताना त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. श्रीपाद हे कोल्हापुरातील देवकर पाणंदमधील वसंत विश्वास पार्कचे रहिवासी होते. ते चांगले क्रिकेट खेळाडू होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, बहीण असा परिवार आहे. हणमंत गणेश जोशी यांचे चिरंजीव आणि अॅड. गोपाळ जोशी यांचे पुतणे होत. रक्षा विसर्जन उद्या, बुधवारी आहे.
श्रीपाद यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूलमध्ये झाले. त्यांनी केआयटी कॉलेजमधून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर ते परदेशातील आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये कन्सल्टंट होते. पुण्यातील एका ग्रुपच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून ते गिर्यारोहन करीत होते. त्यांनी कळसूबाई शिखर दोन वेळा सर केले. याचबरोबर आसामसह महाराष्ट्रातील अनेक शिखरावर त्यांनी यशस्वी मोहीम केली. रविवारी (दि. १४) सकाळी त्र्यंबकेश्वर-नाशिक येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या मोहिमेसाठी ते घरातून बाहेर पडले. त्यांनी मोहीमही पूर्ण केली. माघारी येताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. श्रीपाद यांचा मित्र परिवार मोठा आहे. हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या श्रीपाद यांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या मित्र परिवारासह क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
चौकट
श्रीपाद हे उत्कृष्ट क्रिकेटपटू
शाळेमध्ये असल्यापासूनच श्रीपाद यांना क्रिकेटची आवड होती. ते उत्कृष्ट गिर्यारोहकाबरोबरच उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. केआयटी कॉलेजला असताना ते चार वर्षे कॉलेजच्या क्रिकेट टीमचे कॅप्टन होते. कामामुळे बहुतांशी वेळी ते परदेशामध्ये असत. कोरोनाची साथ वाढल्याने काही दिवसांपासून ते कोल्हापुरात आले होते.
फोटो : १५०२२०२१ श्रीपाद जोशी (निधन)