सोयीच्या राजकारणामुळे ‘शिवसेना’ पराभूत महायुतीला निष्क्रियता भोवली : कार्यकर्ते राबले.. नेत्यांत फंदफितुरी

By Admin | Updated: May 18, 2014 00:41 IST2014-05-18T00:40:56+5:302014-05-18T00:41:20+5:30

भारत चव्हाण ल्ल कोल्हापूर ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ या उक्तीचे प्रत्यंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या नशिबी या निवडणुकीत आले.

'Shiv Sena' defeated 'Mahatubya' due to friendly politics: Activist Rabale | सोयीच्या राजकारणामुळे ‘शिवसेना’ पराभूत महायुतीला निष्क्रियता भोवली : कार्यकर्ते राबले.. नेत्यांत फंदफितुरी

सोयीच्या राजकारणामुळे ‘शिवसेना’ पराभूत महायुतीला निष्क्रियता भोवली : कार्यकर्ते राबले.. नेत्यांत फंदफितुरी

 भारत चव्हाण ल्ल कोल्हापूर ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ या उक्तीचे प्रत्यंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या नशिबी या निवडणुकीत आले. देशपातळीवर निर्माण झालेली नरेंद्र मोदी नावाची लाट, कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विरोधात मतदारांमध्ये असलेली प्रचंड नाराजी आणि शिवसेनेला मिळालेला तुल्यबळ उमेदवार अशी निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असणारी सर्व पोषक परिस्थिती असताना केवळ प्रचारयंत्रणेत जाणीवपूर्वक ठेवलेल्या उणिवा, शिवसैनिक आणि त्यांच्या नेत्यांमधील निष्क्रियता, सोयीचे राजकारण अशा विविध कारणांमुळे शिवसेनेला हातातोंडाला आलेला विजयाचा ‘घास’ गमवावा लागला. शिवसेना, भाजप तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी थोडी अधिक जागरुकता दाखवून बारा, पंधरा हजार मतांची जोडणी केली असती, तर ‘कोल्हापूर’सुद्धा देशाच्या मुख्य राजकीय प्रवाहात आले असते. शिवसेनेची कोल्हापुरात स्थापना होऊन आता पंचवीस वर्षे झाली. या पंचवीस वर्षांत शिवसेनेला सुरेश साळोखे (२ वेळा), दिलीप देसाई, बाबासाहेब पाटील-सरुडकर, सत्यजीत पाटील-सरुडकर, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर असे आठ आमदार मिळाले. तीन अपक्ष आमदारांनीही शिवसेनेला पाठिंबा दिला होता. परंतु आतापर्यंत एकही खासदार मिळाला नाही. १९९१ पासून आजअखेर २३ वर्षांत शिवसेनेने जंगजंग पछाडले. शुक्रवारी विजयी झालेले युवा नेते धनंजय महाडिक, सहकारातील तज्ज्ञ विक्रमसिंह घाटगे यांच्यासारख्या दिग्गजांना सोबत घेऊन निवडणूक जिंकण्याचा प्रयोग करून पाहिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जनतेला साद घालून पाहिली. जिंकण्यासाठी जे काही करायचे ते करून पाहिले. मात्र त्यांना यश आले नाही. त्याला कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारची मजबूत पकड आणि या सहकाराच्या जाळ्यात ओवले गेलेले मतदार! सहकाराचे जाळे भेदून राजकारण करण्यात शिवसेनेला सतत अपयश आले. परंतु यावेळची परिस्थिती वेगळी होती. उमेदवार तोडीचा होता. उमेदवाराच्या नावाला राजकीय करिष्मा होता. त्यामुळेच यावेळी जिंकण्याची संधी जास्त होती. पण ही संधीही शिवसेनेने दवडली. शिवसेनेतील कुरघोडीच्या राजकारणाने उचल घेतली आहे. संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव अशा तीन जिल्हाप्रमुखांची तोंडं तीन दिशेला आहेत. शहराचे आमदार राजेश क्षीरसागर व करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या कामाची पद्धत या तिघांपेक्षा वेगळी आहे. शिवसैनिक या पक्षांतर्गत राजकारणात अडकून पडले आहेत. त्यामुळे ‘टीमवर्क’ तसेच पक्षहिताला जागा राहिलेली नाही. राजकीय शक्ती विभागली गेली असल्याने त्याचा संघटन मोठे व्हायला उपयोग होत नाही. अशीच परिस्थिती भविष्यकाळातही राहिली तर पुढची आणखी पंचवीस वर्षे शिवसेनेला खासदारासाठीची प्रतीक्षा करावी लागेल. यावेळेची निवडणूक शिवसैनिकांना प्रेरणा व उत्साह देणारी होती. नरेंद्र मोदी नावाच्या वादळाने बरेचसे काम हलके करून ठेवले होते. सरकारविरोधी मतदारांमध्ये संतापाची लाट होती. संजय मंडलिक यांच्यासारखा राजकीय करिष्मा लाभलेला उमेदवार होता. फक्त शिवसैनिक आणि शिवसेनेच्या नेत्यांना राजकीय लाटेवर स्वार व्हायचे होते. पण घडले उलटेच. आमदार असोत की जिल्हाप्रमुख यांनी आपली जुनीच मानसिकता कायम ठेवली. प्रत्येकजण जुनेच वाद गोंजारत राहिले. विजय देवणे लोकसभेला इच्छुक होते. त्यांना डावलल्यामुळे ते नाराज होते. त्यांची नाराजी दूर करून त्यांना प्रचारात सक्रीय होण्यासाठी कोणीच प्रयत्न केले नाहीत. शिवसेना आणि उमेदवार मंडलिक यांच्यात प्रचाराच्या यंत्रणेत समन्वयाचा अभाव होता. उमेदवाराची दिशा एकीकडे, तर शिवसैनिकांची दिशा दुसरीकडेच राहिली. ही एकवाक्यता जमून आणता आणता उमेदवारांनाही फेस आला. शिवसेनेतच एकवाक्यता नसेल तेथे भाजप, आरपीआय (आठवले गट), स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रचारात कुणी सक्रीय करायचे हा प्रश्नच होता. सहकारी पक्षाचे कार्यकर्तेही जबाबदारी नसल्यासारखेच वागले. शिवसेनेला करवीर, राधानगरी या विधानसभा मतदारसंघात कमी मते मिळाली. करवीरमध्ये तर चंद्रदीप नरके शिवसेनेचे आमदार आहेत. करवीर, राधानगरी, भुदरगड तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद आहे. असे असताना संजय मंडलिक यांच्यापेक्षा धनंजय महाडिक यांना करवीरमध्ये ३४ हजारांचे, तर राधानगरी-भुदरगडमध्ये २३ हजारांचे मताधिक्य मिळते, हेच उघड गुपीत आहे. या तीन तालुक्यांत महायुतीचा धर्म नेते मंडळींनी तंतोतंत पाळला असे म्हणणे धाडसाचे ठरेल. राजकारणात आधी स्वत:चा आणि मग आपल्या पक्षाचा स्वार्थ पाहण्याची मानसिकता असते. आपले मित्र कोण आहे, आपल्याला कोणाची मदत होणार आहे, याचा अभ्यास राजकारणात केला जातो. अशा प्रकारच्या बेरजेच्या राजकारणाचा विधानसभा समोर ठेवून विचार झाल्यानेच मंडलिक पराभूत झाले. त्याशिवाय करवीर, राधानगरी व भुदरगड येथून दगाबाजी होण्याची शक्यता नाही. मंडलिकांच्या आणि शिवसेनेच्या पराभवाचे विश्लेषण करताना सोयीचे राजकारण आणि गाफीलपणा नडला, असेच म्हणावे लागेल. आता ही संधी शिवसेनेला पुन्हा लवकर येणार नाही.

Web Title: 'Shiv Sena' defeated 'Mahatubya' due to friendly politics: Activist Rabale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.