शित्तूर-वारूण आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणजे कर्मचाऱ्यांचे 'आवो-जाओ घर तुम्हारा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST2021-06-01T04:18:04+5:302021-06-01T04:18:04+5:30
सतीश नांगरे लोकमत न्यूज नेटवर्क शित्तूर-वारूण : शित्तूर-वारूण (ता. शाहूवाडी) येथील आरोग्यवर्धिनी केंद्र हे सध्या येथील कर्मचाऱ्यांच्या 'आवो-जाओ घर ...

शित्तूर-वारूण आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणजे कर्मचाऱ्यांचे 'आवो-जाओ घर तुम्हारा'
सतीश नांगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
शित्तूर-वारूण :
शित्तूर-वारूण (ता. शाहूवाडी) येथील आरोग्यवर्धिनी केंद्र हे सध्या येथील कर्मचाऱ्यांच्या 'आवो-जाओ घर तुम्हारा' या तत्त्वावर चालले आहे. या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती ही आता रुग्णांच्या जिवावर बेतू लागली आहे. रुग्णांना आरोग्य सुविधाच मिळणार नसतील, तर असे आरोग्य केंद्र हवेच कशाला? असा उद्विग्न सवाल शित्तूर-वारूण परिसरातील सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे.
शनिवारी सकाळी दहाच्या दरम्यान अंबाईवाडा येथील सहदेव पांडुरंग सकपाळ (वय ५०) या रुग्णास आरोग्य केंद्रात आणले गेले.
त्यावेळी तेथे वैद्यकीय अधिकारी किंवा आरोग्य सहायक कोणीही उपस्थित नव्हते. एक आरोग्य सेवक, एक सिस्टर व एक शिपाई असा स्टाफ त्यावेळी तेथे उपस्थित होता. रुग्णाची अवस्था पाहून त्यांना काय करावे हे कळेना? वैद्यकीय अधिकाऱ्यांशी फोनाफोनी करण्यात पंधरा ते वीस मिनिटांचा वेळ गेल्यानंतर त्यांना खासगी किंवा मलकापूर रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले. रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णास गावातील एका खासगी दवाखान्यात नेले. तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. खासगी डॉक्टरांनी रुग्णास तपासले असता रुग्ण मृत झाला असल्याचे सांगितले.
गेल्याच आठवड्यात वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने दुपारी एकच्या दरम्यान प्रसव वेदनेने विव्हळत असलेल्या एका महिला रुग्णास मलकापूर रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. खासगी वाहनाने मलकापूरला जात असतानाच गाडीतच त्या महिलेची प्रसूती झाली. गोंधळून गेलेल्या त्या महिलेच्या पतीला व ड्रायव्हरला काय करावे तेच कळेना.
सुमारे चार कोटी रुपये खर्च करून या आरोग्यवर्धिनी केंद्राची इमारत बांधण्यात आली आहे. परिसरातील रुग्णांना मात्र या ठिकाणी अपेक्षित आरोग्य सुविधा मिळत नाहीत. गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या या आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना त्याचे काहीच देणेघेणे नाही. मस्टरवर सह्या करून वेळेआधीच घर गाठणाऱ्या अशा कामचुकार कर्मचाऱ्यांना आरोग्य प्रशासनाने कडक शिस्त लावण्याची गरज आह
प्रत्यक्षात कामाचा अवाढव्य व्याप असल्याचा केवळ देखावा करणारे येथील कर्मचारी रुग्णांची पद्धतशीरपणे हेळसांड करत असतात. त्यातूनही जर यांनी रुग्णांवर उपचार केलाच तर उपकार केल्याच्या अविर्भावात हे अधिक असल्याच्या भावना परिसरातील नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहेत.
अशोक सकपाळ (मयत रुग्णाचे पुतणे)
आरोग्य केंद्रात पोहोचलो त्यावेळी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. बराचसा वेळ गेल्यानंतर आम्हाला मलकापूर रुग्णालय किंवा खासगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला देण्यात आला. नियतीने तेव्हाच डाव साधला. खासगी दवाखान्यात पोहोचलो तेव्हा आमचे चुलते मयत झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
डॉ. एच. निरंकारी (तालुका वैद्यकीय अधिकारी)
संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी लेखी तक्रार दिल्यास या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करता येईल.
फोटो :
आरोग्यवर्धिनी केंद्र शित्तूर-वारूण