शेट्टींना ‘शिरोळ’, ‘इचलकरंजी’, तर मानेंना ‘पन्हाळा-शाहूवाडी, ‘वाळव्यात’ अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 14:59 IST2019-04-18T01:13:27+5:302019-04-19T14:59:53+5:30
राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : खासदार राजू शेट्टी गेल्या निवडणुकीत सहाही विधानसभा मतदारसंघांत मोठे मताधिक्य घेत ...

शेट्टींना ‘शिरोळ’, ‘इचलकरंजी’, तर मानेंना ‘पन्हाळा-शाहूवाडी, ‘वाळव्यात’ अडचण
राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : खासदार राजू शेट्टी गेल्या निवडणुकीत सहाही विधानसभा मतदारसंघांत मोठे मताधिक्य घेत विजयी झाले होते; पण आता विरोधी उमेदवाराने चांगलीच हवा केली असून, त्यांच्या दृष्टीने ‘शिरोळ’ व ‘इचलकरंजी’ मतदारसंघ घातक ठरण्याची शक्यता आहे. धैर्यशील माने यांची पहिलीच निवडणूक असली, तरी त्यांनाही पन्हाळा-शाहूवाडी व वाळव्यातील मतदारांना खेचण्याचे आव्हान राहणार आहे.
हातकणंगले मतदारसंघाचे सध्याचे राजकीय बलाबल पाहिले, तर येथे शिवसेनेचे तीन आणि भाजपचे दोन असे युतीचे पाच आमदार आहेत, तर एक राष्टÑवादीचे आमदार आहेत. पुनर्रचित मतदारसंघातील २००९ ची पहिली लढत राजू शेट्टी व निवेदिता माने यांच्यात झाली होती. यामध्ये माने यांच्यावर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवीत शेट्टी यांनी संसदेत प्रवेश केला. २०१४ ला राष्टÑवादीने ऐनवेळी हा मतदारसंघ कॉँग्रेसला सोडत शेट्टींना रोखण्यासाठी ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांना रिंगणात उतरवले; पण त्यांनी आवाडे यांच्यावर तब्बल एक लाख ७७ हजार ८१० इतक्या मताधिक्याने विजय मिळविला. आता युतीचे पाच आमदार, दोन मंत्र्यांची ताकद, माने गट, तरुणांची फळी व आक्रमक वक्तृत्वशैलीने धैर्यशील माने यांनी शेट्टींसमोर आव्हान उभे केले आहे. शेट्टी यांच्यामागे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह दोन्ही कॉँग्रेसचे नेते आहेत; पण शेट्टी यांची खरी भिस्त ही शेतकऱ्यांवरच राहणार आहे. ‘शिरोळ’, ‘इचलकरंजी’तील अंतर्गत राजकारण हे त्यांच्यादृष्टीने डोकेदुखी ठरू शकते, तर माने पन्हाळा-शाहूवाडी व वाळव्यातील शेतकऱ्यांना आपलेसे करण्यात किती यशस्वी होतात यावरच जय-पराजय अवलंबून आहे.
राजू शेट्टी यांची शक्तिस्थाने
जयंत पाटील, प्रकाश आवाडे, गणपतराव पाटील, जयवंतराव आवळे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख, मानसिंगराव गायकवाड, संजीवनीदेवी गायकवाड, जनता दलासह शेतकºयांची ताकद.
धैर्यशील माने यांची शक्तिस्थाने
सदाभाऊ खोत, वैभव नायकवडी, शिवाजीराव नाईक, उल्हास पाटील, माधवराव घाटगे, सुरेश हाळवणकर, सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील-सरूडकर यांसह शिवसेना, भाजप, रिपाइंची सगळी रसद.