रोज पाहतो मरण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:24 IST2021-04-23T04:24:50+5:302021-04-23T04:24:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोरोना संसर्गाची दुसरी लाट अत्यंत भयानक व वेदनादायी आहे. गेल्या चार दिवसांत या संसर्गामुळे ...

रोज पाहतो मरण...
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : कोरोना संसर्गाची दुसरी लाट अत्यंत भयानक व वेदनादायी आहे. गेल्या चार दिवसांत या संसर्गामुळे ८५, तर दोन महिन्यांत २६० जणांवर अग्निसंस्कार करण्याचा प्रसंग पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांवर आला आहे. तीन प्रहरात २० कर्मचारी जिवावर उदार होऊन कर्तव्याला पहिले प्राधान्य देत, हे अंत्यसंस्काराचे काम करीत आहेत.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने देशभरात पसरत आहे. त्यात कोल्हापुरातही हा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यात मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही वाढू लागले आहे. गेल्या दोन महिन्यांत २६० कोरोनाग्रस्त मृतांवर पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी अग्निसंस्कार केले आहेत. गेल्या चार दिवसांत तर मोठी भयाण स्थिती येथे आहे. तीन प्रहरात ८ - ८ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एकूण ८५ कोरोनाग्रस्तांवर, तर इतर व्याधींनी मृत झालेले २५, अशा एकूण ११० जणांवर अंत्यसंस्कार केले आहेत. प्रत्येक कर्मचारी पीपीई कीट घालून, सॅनिटायझरचा वापर करून हे कार्य करीत आहे. अनेकांच्या अंत्यसंस्काराला एक किंवा दोन नातेवाईकच हजर असतात. अशावेळी त्या मृताचे नातेवाईक होऊन सर्व सोपस्कारही हे कर्मचारीच पूर्ण करतात. दिवसभरात हे कीट घातल्यामुळे अंगाची लाहीलाही होते आणि वरून उन्हाच्या तीव्र झळा. अशा परिस्थितीत आलेल्या कोरोना मृतावर एक मण लाकूड व साडेचारशे शेणी हे कर्मचारी रचतात. त्यानंतर स्वत:च कापूर घेऊन त्यावर आपलाच नातेवाईक असल्याप्रमाणे मृताला संसारी मोहातून सुटका मिळावी, म्हणून ‘हराटी मंत्र’ म्हणून अग्निसंस्कार करतात.
एकही बाधित नाही
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत पीपीई कीट, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि योग्य ती काळजी घेऊन अंत्यसंस्कार केल्यामुळे एकाही कर्मचाऱ्याला अद्यापही कोरोना संसर्ग झालेला नाही. एक कोरोनाग्रस्त मृत आल्यानंतर पूर्णपणे प्लास्टिकने मृतदेह झाकलेला असतो. तरीसुद्धा काळजीपोटी कर्मचारी पीपीई कीट घालूनच तो मृतदेह रचलेल्या सरणावर ठेवतात. त्यानंतर शेणी, कापूर लावून दहन करतात. दहन झाल्यानंतर सॅनिटायझरने सर्व शरीराची स्वच्छता करतात. प्रत्येकाच्या तोंडाला एन-९५ मास्क सक्तीचा आहे.
येथील कोरोना योद्धे असे...
अरविंद कांबळे (आरोग्य निरीक्षक), बाबासाहेब भोसले, सुनील कांबळे, तुळसीदास कांबळे, प्रदीप बानागे, अनिल चौगले, विलास कांबळे, करण बानागे, विल्सन दाभाडे, हिंदुराव सातपुते, अशोक गवळी, रवी कांबळे, जयदीप कांबळे, वैभव लिगडे, प्रसाद सरनाईक, अमोल कांबळे, आशिष बानागे, राजू कांबळे यांचा समावेश आहे.
दृष्टिक्षेप...
एकूण दहन बेडची संख्या - ४७
कोरोना मृतांसाठी राखीव - २७ बेड
नाॅन कोविड मृतांसाठी राखीव - २०
कर्मचारी संख्या - २०
कामाच्या वेळा : २४ तास, तीन प्रहरात
गॅसदाहिनी - १
दोन महिन्यात कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार - २६०
गेल्या चार दिवसांत कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार - ८५
कोट
पीपीई कीट, सॅनिटायझरचा पुरेपूर वापर करून कोरोनाग्रस्त मृतावर अंत्यसंस्कार करतात. एकही कर्मचारी कोरोनाने बाधित नाही. तीन प्रहरात अखंडपणे २४ तास काम सुरू आहे.
- अरविंद कांबळे , आरोग्य निरीक्षक