कागलच्या पाझर तलावाला पाणगवताचा विळखा
By Admin | Updated: June 1, 2015 00:12 IST2015-05-31T22:43:06+5:302015-06-01T00:12:40+5:30
पालिकेचा सुशोभीकरणाचा फार्स : जैवविविधता धोक्यात; पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी

कागलच्या पाझर तलावाला पाणगवताचा विळखा
वीरकुमार पाटील - कोल्हापूर -कागल येथील पाझर तलावाला सध्या पाणगवताचा विळखा पडला आहे. त्यामुळे येथील पाण्याचे प्रदूषण होत असून, तलावातील जैवविविधता धोक्यात आली आहे. बोटिंगसह मासेमारीच्या ठेक्याचे पैसे घेणाऱ्या नगरपालिकेचे, लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या दुर्लक्षामुळे भविष्यात हा तलाव होता, असे म्हणण्याची वेळ आली तर त्यात नवल ठरणार नाही. या तलावाभोवती शासनाच्या निधीतून तलावाच्या भराव मजबुतीचे, सुशोभीकरणाचे काम सध्या सुरू आहे; पण तलावाचे बाह्य सौंदर्य किती जरी देखणे केले तरी मूळ तलाव स्वच्छ ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, नेमके तेच पालिकेकडून होत नाही. याबाबत पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जयसिंगराव तलावातील पाणी पातळी कमी झाल्यावर काही वर्षांपूर्वी कागल पालिका या तलावातून पाणी घेत होती. तसेच परिसरातील साधारणत: चार ते पाच किलोमीटरवरील विहिरी, बोअरच्या पाणी पातळीत वाढ झाली.
तीन वर्षांपूर्वी आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कागल नगरपालिकेतर्फे पाझर तलावामध्ये सुशोभीकरणाबरोबरच बोटिंगची सोय केली आहे. बगीच्याजवळ समुद्राची वाळू पसरली असून, ‘मिनी गोवा’ अशी जाहिरात केली आहे. येथील बोटिंगचा ठेका एक वर्षासाठी सुयोग शिंदे यांना साधारणत: अडीच लाखाला दिला. त्याशिवाय मासेमारी करण्यासाठी अंदाजे ५0 हजाराला ठेका दिला आहे. म्हणजेच या पाझर तलावातून वर्षाकाठी सरासरी तीन लाखांचे उत्पन्न कागल पालिकेला मिळते. इतके उत्पन्न मिळूनही पालिकेचे तलावाच्या स्वच्छतेकडे अजिबात लक्ष नाही.
तलाव चोहोबाजूंनी हळूहळू प्रदूषणाच्या विळख्यात सापडत आहे. तलाव जरी साधारणत: ७२ एकरांत असला, तरी त्यातील चार ते पाच एकरांत पाणगवताचे साम्राज्य आहे. हे गवत दोन वर्षांपूर्वी काढले होते. त्याची आता पुन्हा वाढ झाली आहे.
हिवाळ्यात या तलावात परदेशी पक्ष्यांचे आगमन होते. त्यामुळे तलाव जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करायचे असेल, तर पाणगवतामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात येण्यापूर्वीच नगरपालिकेने तातडीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
सध्या पाण्याची पातळी कमी आहे, तोवरच गवत काढता येणे शक्य असून त्यासाठी पालिकेने तातडीने हालचाल करणे गरजेचे आहे.
या पाझर तलावाचे क्षेत्रफळ पाहता पाणगवत काढण्यासाठी रासायनिक प्रक्रिया केल्यास त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मनुष्यबळाच्या साहाय्यानेच हे गवत समूळ काढावे लागेल. गवत्या माशांची जाणीवपूर्वक वाढ केल्यास या वनस्पतीची वाढ रोखता येईल.
- डॉ. विवेक रोहिदास वर्तक,
मत्स्य शास्त्रज्ञ, खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल.
यापूर्वी पाणगवत काढले होते; पण ते पुन्हा वाढले. तलावाच्या भरावाचे काम सध्या सुरू आहे. हे काम संपताच पाणगवत काढण्यात येईल. तलावात पाणवनस्पती खाणारे मासे सोडले आहेत. ते किमान दीड किलोचे झाल्याशिवाय मारू नयेत, अशा सूचना मासेमारी करणाऱ्या ठेकेदाराला दिल्या आहेत. बोटिंग ठेकेदाराने सिंगल फेज कनेक्शन घ्यावे. त्याला पालिका ना हरकत दाखला देईल.
- प्रभाकर पत्की, मुख्याधिकारी, कागल नगरपालिका.