दक्षिणेत ‘ऋतु’राज्य; ४२७०९ मतांनी विजयी; अमल महाडिक यांना पराभवाचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 11:33 AM2019-10-25T11:33:09+5:302019-10-25T11:35:51+5:30

या विजयाने आमदार पाटील यांनी ‘कोल्हापूर दक्षिण’ पुन्हा आपल्याकडे खेचून घेत ‘ऋतु’राज्य आणले. जिल्ह्यातील ‘हाय व्होल्टेज लढतीचा मतदारसंघ’ अशी ओळख असलेल्या ‘कोल्हापूर दक्षिण’ मतदारसंघात दोन लाख ४३ हजार ८२२ मतदान झाले.

The 'Season' Kingdom in the South | दक्षिणेत ‘ऋतु’राज्य; ४२७०९ मतांनी विजयी; अमल महाडिक यांना पराभवाचा धक्का

दक्षिणेत ‘ऋतु’राज्य; ४२७०९ मतांनी विजयी; अमल महाडिक यांना पराभवाचा धक्का

Next
ठळक मुद्देप्रचारामध्ये उमेदवारांऐवजी या दोघांनी एकमेकांवर टीका-टिप्पणी केली.

कोल्हापूर : ‘महाडिक नकोच’ मोहिमेतील तिसरा टप्पा यशस्वी करीत कॉँग्रेसचे युवा उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांनी भाजपचे विद्यमान आमदार अमल महाडिक यांचा कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून ४२७०९ इतक्या मताधिक्याने दारुण पराभव करीत धुव्वा उडविला. पाच वर्षांपूर्वी ज्या ‘दक्षिण’मधून सतेज पाटील यांचा अमल महाडिक यांनी पराभव केला होता, त्याचे पुरेपूर उट्टे काढून ऋतुराज यांनी जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारा उमेदवार ठरत गुरुवारी बाजी मारली. हीलढत अटीतटीची होणार, असे वातावरण असताना प्रत्यक्षात लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही महाडिक यांना मोठ्या फरकाने पराभूत करण्यात आमदार पाटील यांना यश आले. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलणार असून, महाडिक यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा राहणार आहे.

या विजयाने आमदार पाटील यांनी ‘कोल्हापूर दक्षिण’ पुन्हा आपल्याकडे खेचून घेत ‘ऋतु’राज्य आणले.
जिल्ह्यातील ‘हाय व्होल्टेज लढतीचा मतदारसंघ’ अशी ओळख असलेल्या ‘कोल्हापूर दक्षिण’ मतदारसंघात दोन लाख ४३ हजार ८२२ मतदान झाले. त्यापैकी ऋतुराज पाटील यांना एक लाख ४० हजार १०३, अमल महाडिक यांना ९७ हजार ३९४ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या बबनराव ऊर्फ दिलीप कावडे यांना २२१९, तर उर्वरित उमेदवार एक हजार मतांच्या आत राहिले. १९३९ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला. राजाराम तलाव परिसरातील शासकीय गोदाममधील ‘ए’ हॉलमध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.

त्यातील पहिल्या फेरीत ऋतुराज पाटील यांना लक्षतीर्थ वसाहत, मीराबाग, फुलेवाडी, रिंग रोड परिसरातून ३८०२ मतांची आघाडी मिळाली. त्यानंतर राजोपाध्येनगर, साने गुरुजी वसाहत, राजलक्ष्मीनगर, सुर्वेनगर, साळोखेनगर, आदी उपनगरांमध्येही त्यांचे मताधिक्य वाढत राहिले. नवव्या फेरीत त्यांनी २५,५३३ मतांची निर्णायक आघाडी घेत विजयाच्या दिशेने कूच केली. पुढील आठ फेऱ्यांमध्ये मताधिक्य मिळवीत त्यांनी ४२७०९ मतांनी आमदार महाडिक यांचा पराभव केला. एकाही फेरीत महाडिक यांना आघाडी मिळाली नाही. गेल्या निवडणुकीत शहरातील ज्या २७ प्रभागांमध्ये महाडिक यांना सुमारे नऊ हजारांचे मताधिक्य होते, त्या प्रभागांनी यावेळी ऋतुराज यांना २४,९६५ इतके तिप्पट मताधिक्य दिले. ग्रामीण भागातील पाचगाव, उचगाव, वळिवडे, गोकुळ शिरगाव, आदी ३६ गावांनी १७,७४४ मतांच्या आघाडीसह त्यांना विजयाचा हात दिला. त्याच्या जोरावर ऋतुराज यांनी दक्षिणमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकविला.

सलग दुसºयांदा विजय मिळविण्याचा निर्धार करीत निवडणुकीच्या रिंगणात आमदार महाडिक पुन्हा उतरले. विधान परिषद, लोकसभेनंतर विधानसभेलाही ‘महाडिक नकोच’आणि ‘आमचं ठरलंय’ या भूमिकेचा दुसरा भाग म्हणून आमदार पाटील यांनी पुतणे ऋतुराज यांना ‘दक्षिण’च्या आखाड्यात उतरविले. ‘आमचं ठरलंय, आता फक्त ‘दक्षिण’ उरलंय’, असा नवा नारा देत आणि ‘मिशन रोजगार’द्वारे आमदार पाटील गट, तर मतदारसंघात ११५० कोटींची विकासकामे केल्याचा दावा करीत आणि ‘पुन्हा कमळ- दक्षिणेत अमल’ अशी साद देत महाडिक गट हा मतदारांपर्यंत पोहोचला. मात्र, त्यात मतदारांनी ऋतुराज पाटील यांच्या बाजूने भरघोस कौल दिला. आश्वासक आणि नवसंकल्पना राबविणारा युवक अशी असलेली ओळख, ‘नवं कोल्हापूर दक्षिण’ घडविण्याचे व्हिजन, रोजगारनिर्मितीचे मांडलेले ‘मिशन रोजगार’ हे मतदारांना भावले. तसेच शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना लोकसभेत सतेज पाटील गटाने केलेल्या मदतीचा पैरा शिवसेनेनेही पाठिंबा देऊन फेडला. त्यामुळे ऋतुराज हे जिल्ह्यातील दुसºया क्रमांकाच्या मताधिक्याने विजयी झाले. लोकसभेपासून आलेली ‘महाडिकविरोधी लाट’, मतदारसंघात फारसा संपर्क नसणे, भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता केवळ ‘महाडिक गट’ म्हणून राबविलेली प्रचार यंत्रणा, अतिआत्मविश्वास, आदींचा अमल महाडिक यांना फटका बसला.

सन २०१९ मधील उमेदवार, त्यांना मिळालेली मते
ऋतुराज पाटील (काँग्रेस) : १,४०,१०३
अमल महाडिक (भाजप) : ९७,३९४
सचिन अप्पासाहेब कांबळे (बसपा) : ८६७
चंद्रकांत सुदामराव नागावकर (बहुजन मुक्ती मोर्चा) : २२५
दिलीप कावडे (वंचित बहुजन आघाडी) : २२१९
राजेंद्र बाबू कांबळे (अपक्ष) : १४९
सलीम नूरमहंमद बागवान (अपक्ष): ४३३
अमित प्रकाश महाडिक (अपक्ष) : ३१६

नोटा : १९३९
एकूण झालेले मतदान : २,४३,८२२
एकूण वैध मतदान : २,४१,७०६
एकूण अवैध मतदान : १७७

तीन लढतींमध्ये दोन वेळा पाटील गटाची बाजी
मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये पहिल्यांदा सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात लढत झाली. गेल्या निवडणुकीत सतेज पाटील आणि अमल महाडिक यांच्यात लढत रंगली. यावेळी ऋतुराज पाटील आणि अमल महाडिक यांच्यात लढत झाली. विविध राजकीय पक्ष आणि संघटना असल्या, तरी सतेज पाटील गट आणि महाडिक गटांमध्ये ही निवडणूक झाली. अमल महाडिक आणि ऋतुराज पाटील यांच्यात लढत झाली असली, तरी या निवडणुकीत आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक हेच केंद्रस्थानी राहिले. प्रचारामध्ये उमेदवारांऐवजी या दोघांनी एकमेकांवर टीका-टिप्पणी केली. या तिस-यांदा झालेल्या लढतीत पाटील गटाने बाजी मारली.
 

Web Title: The 'Season' Kingdom in the South

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.