मोर्चादिवशी जिल्ह्यातील शाळांना हवी सुटी

By Admin | Updated: September 22, 2016 01:08 IST2016-09-22T01:08:09+5:302016-09-22T01:08:09+5:30

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

School holidays are required for schools in the district | मोर्चादिवशी जिल्ह्यातील शाळांना हवी सुटी

मोर्चादिवशी जिल्ह्यातील शाळांना हवी सुटी


सातारा : सातारा येथे दि. ३ आॅक्टोबर रोजी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या दिवशी शाळा, कॉलेजला सुटी जाहीर करावी, अशी मागणी कोरेगाव विकास मंचच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही. त्यामुळे या समाजातील तरुण पिढीला विशेषत: उच्च शिक्षित तरुणांना गुणवत्ता असूनही डावलले जात
आहे.
मराठा समाजातील मागील पिढी गुणवत्ता असूनही आरक्षणाच्या नावाखाली मागे ढकलली गेली. तसेच गुणवत्ता असूनही हाताला योग्यतेनुसार काम नसल्याने मराठा समाज आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे़ परिणामी मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचा फार मोठा परिणाम मराठा समाजावर झाला आहे़ पुढील पिढीचे भविष्य वाचविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाज एकत्र येत आहे. आरक्षणासाठी दि. ३ आॅक्टोबरच्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी होणार आहोत़
मराठा समाज आरक्षणाची मागणी मुख्यत: पुढील पिढी म्हणजे आताची शाळा, कॉलेजचे विद्यार्थी आहेत. त्यांनी या मोर्चात सहभागी होणे योग्यच आहे़ त्यांना तशी संधी मिळावी यासाठी दि. ३ आॅक्टोबर रोजी शाळा, कॉलेजला सुटी जाहीर करावी, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवेदनावर कोरेगाव विकास मंचचे अध्यक्ष किशोर बर्गे, दिलीपराव बर्गे, रामचंद्र बोतालजी, संतोष बर्गे, महेश बर्गे, विठ्ठलराव काटे, रोहित जाधव, अनिल बर्गे, अनिल पवार, राजेंद्र बर्गे, अधिक जाधव, विनोद गोरे, अरुणराव बर्गे, श्रीकांत बर्गे, संतोष कदम, चंद्रकांत शिंदे यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)
जावळीतील मुस्लीम समाजाचा मोर्चाला पाठिंबा
कुडाळ : जावळी तालुक्याच्या कुडाळ परिसरातील साठ गावांची मराठा मोर्चासाठी बैठक झाली. या मोर्चाला जावळी तालुक्यातील मुस्लीम बांधवांनी पाठिंबा जाहीर केला आहे. दि. ३ आॅक्टोबर मराठ्यांची राजधानी सातारा येथे ‘न भूतो न भविष्यती’ असा मोर्चा करण्याचा संकल्प यावेळी जावळीकरांनी केला. या मोर्चाला सहकार्य व जाहीर पाठिंबा जावळीतून करण्याचा निर्णय जावळीतील मुस्लीम समाजाने घेतला आहे. कुडाळ येथील गजानन मंगल कार्यालय येथे मराठा समाजाची बैठक झाली. ‘मराठा समाज हा मुस्लीम समाजाचा मोठा भाऊ आहे,’ असे मुस्लीम बांधवांनी म्हटले.

मराठा क्रांती मोर्चास ‘रिपाइं’चा पाठिंबा
वाठार स्टेशन : ‘आपल्या न्याय हक्कासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मोर्चा काढून मागणी करणे हा घटनेने दिलेला अधिकार असून, त्याबद्दल विनाकारण गैरसमज पसरवून सामाजिक दरी निर्माण करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. आपण आपल्या कार्यकर्त्याबरोबर मराठा क्रांती मोर्चात सहभागी होणार आहे,’ असे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अमोल आवळे यांनी जाहीर केले आहे.
गेली अनेक वर्षे सत्ता उपभोगून केवळ स्वत:ची घरे भरणाऱ्या नेतेमंडळींकडून मराठा समाजाचा अपेक्षा भंग झाला आहे. महाराष्ट्रात निघत असलेले मोर्चे त्याचे प्रतीक आहेत. कोपर्डीची घटना निश्चितपणे निंदनीय आहे. आम्ही त्याचा निषेधच करतो याशिवाय अशा गुन्हेगारास कुणीही पाठीशी घालणार नाही. गुन्हेगारांना कोणतीही जात नसते विनाकारण जातीय तेढ वाढू नये. या मोचार्ला प्रति मोर्चा काढून जसास तसे उत्तर देण्याची तयारी होत असल्याची माहिती मिळत आहे. माझे सर्व दलित संघटना आणि बांधवांना आवाहन आहे की, आपण असे करू नये असेही आवळे यानी म्हटले आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: School holidays are required for schools in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.