लॉकडाऊनमुळे खरेदीसाठी झुंबड,कोरोना खबरदारीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 18:05 IST2021-04-09T18:02:33+5:302021-04-09T18:05:59+5:30
CoronaVirus Kolhapur : एकीकडे कडक निर्बंधामुळे पन्नास टक्क्याहून अधिक व्यापारी अस्थापना बंद असताना दुसरीकडे मात्र लॉकडाऊनच्या भितीने शुक्रवारी शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी उसळली होती. दिवसभर ही गर्दी कायम राहिली. त्यामुळे शारिरीक अंतर राखण्याचे भान कोणालाही राहिले नाही.

लॉकडाऊनमुळे खरेदीसाठी झुंबड,कोरोना खबरदारीकडे दुर्लक्ष
कोल्हापूर : एकीकडे कडक निर्बंधामुळे पन्नास टक्क्याहून अधिक व्यापारी अस्थापना बंद असताना दुसरीकडे मात्र लॉकडाऊनच्या भितीने शुक्रवारी शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी उसळली होती. दिवसभर ही गर्दी कायम राहिली. त्यामुळे शारिरीक अंतर राखण्याचे भान कोणालाही राहिले नाही.
कोल्हापूर शहरात गेल्या पाच दिवसापासून कडक निर्बंध लादण्यात आले. आहेत. अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता शहरातील पन्नास ते साठ टक्के व्यापारी अस्थापने बंद आहेत. व्यापारांचा अशा बंदला विरोध आहे. व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्या, अशी मागणी व्यापारी संघटनांकडून होत आहे. परंतु त्यांची मागणी अद्यापही गांभिर्याने घेतली गेलेली नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी व्यापारी व दुकानदार शटर बंद करुन आत व्यवसाय करत आहेत.
शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन सुरु झाला. पुढचे दोन दिवस कुठेच बाहेर पडता येणार नसल्यामुळे शहरवासियांनी दोन दिवस लागतील एवढ्या जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तू खरेदीकरिता बाजारपेठेत गर्दी केली होती. लक्ष्मीपुरी बाजारपेठेतील गर्दी नजरेत भरणारी होती. गुडी पाडव्याचा सण मंगळवारी आहे. त्याच्या निमित्ताने देखिल खरेदी झाली. विविध खाद्यपदार्थाहस बेकरी पदार्थ घेण्यावर ग्राहकांचा अधिक जोर होता.
व्यापारी व दुकानदारांनी आपले व्यवहार बाहेरुन बंद ठेवले होते, परंतु एखादे गिऱ्हाईक आले की त्यांना शटर उघडून आत घेतले जात होते. चोरुन व्यवसाय सुरु होते. काही हॉटेल मालकांनी देखिल हाच फंडा वापरला होता. बाहेरचे दरवाजे बंद पण आत मात्र व्यवहार सुरु होते. फक्त भांड्याची तसेच कापड दुकाने, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीकल वस्तूंची दुकाने मात्र पूर्णत: बंद होती. शहरातील मॉल बंद होते.
केएमटी, एस.टी बस वाहतुक सुरु असली तरी त्याठिकाणी शारिरीक अंतराचा नियम पाळला जात नव्हता. वडाप तसेच रिक्षा वाहतुकही सुरु होते, तेथेही नियम पाळले जात नव्हते. शुक्रवारी खासबाग मैदानाजवळील खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरु होत्या. पहिले दोन तीन दिवस त्यांनी बंद पाळला. शुक्रवारी रात्रीपासून लॉकडाऊन सुरु होणार म्हणून सर्वत्र गर्दी झाल्याचे पहायला मिळाले.