लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १,०२५ ग्रामपंचयतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत बुधवारी तालुक्याच्या ठिकाणी काढण्यात आली. यामध्ये आरक्षणामुळे सर्वाधिक ५१२ ग्रामपंचायतींवर महिलाराज राहणार आहे. २९५ सरपंचपदे खुली झाली. १४० सरपंच हे नागरिकांच्या मागास प्रवर्ग, तर १४२ सरपंच अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाली. शिरोळ तालुक्यातील घोसरवाड व करवीर तालुक्यातील भामटे ही गावे सरपंच विनाच राहणार आहेत. येथे अनुक्रमे अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारच नसल्याने त्रांगडे तयार झाले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी सरपंचपदाचे आरक्षण काढले जाते. मात्र, या टप्प्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्यानंतर हे आरक्षण काढण्यात आले. निकाल लागल्यापासून सरपंच आरक्षण काय पडेल, याचे आडाखे बांधले जात होते. मागील दाेन टर्मला कोणते आरक्षण होते, आता काय पडू शकेल, याचा ठोकताळा बांधूनच आरक्षण सोडतीच्या ठिकाणी इच्छुक गेले होते. पहिल्यांदा अनुसूचित जाती, जमाती, त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग ही आरक्षणे काढण्यात आली. अनेक गावांतील आरक्षणांवर हरकती घेण्यात आल्या, यातून काही अधिकाऱ्यांशी वादही घातले गेले.
फेरआरक्षण
घोसरवाड, भामटेचे सरपंचपद रिक्त राहणार आहे. सरपंच निवडीनंतर संबंधित निवडणूक अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करतील. त्यानंतर आरक्षणात बदल केला जाणार आहे.
अनुसूचित जमातीचे पाच सरपंच
जिल्ह्यात अनुसूचित जमाती या प्रवर्गातील पट्टणकोडोली (ता. हातकणंगले), घोसरवाड व राजापूरवाडी (ता. शिरोळ), येळाणे (ता. शाहूवाडी), आरळगुंडी (ता. गडहिंग्लज) सरपंच आरक्षण पडले आहे. त्यापैकी घोसरवाड वगळता चार ठिकाणीच सरपंच होणार आहे.
इच्छुकांची घालमेल... नाराजी आणि जल्लोष
सरपंचपदाचे आरक्षण काय पडेल, याचा अंदाज नसल्याने निवडणुकीत सर्वच प्रभागांत टाेकाची ईर्षा पाहावयास मिळाली. त्यामुळे आरक्षण सोडतीवेळी इच्छुकांची घालमेल झाली. काहींची नाराजी झाली, तर काहींनी अपेक्षित सरपंच आरक्षण पडल्याने जल्लोष केला.