चुकीची माहिती दिल्यावरून ‘विद्यापीठ विकास आघाडी’कडून सभात्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:25 IST2020-12-31T04:25:20+5:302020-12-31T04:25:20+5:30
कोल्हापूर : सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने जाणीवपूर्वक संदिग्ध उत्तरे तसेच चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत विद्यापीठ ...

चुकीची माहिती दिल्यावरून ‘विद्यापीठ विकास आघाडी’कडून सभात्याग
कोल्हापूर : सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने जाणीवपूर्वक संदिग्ध उत्तरे तसेच चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत विद्यापीठ विकास आघाडीने अधिसभेचा (सिनेट) बुधवारी त्याग केला.
परिनियमानुसार प्रश्न विचारूनही कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी ते नाकारल्याचे कारण पुढे करत विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) प्रश्नोत्तरांच्या तासावर बहिष्कार टाकला. त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला. विविध अधिविभागांमधील राजकारण आणि वाद, विद्यापीठाची बदनामी करणाऱ्या संघटनांना काही अधिकाऱ्यांकडून बळ मिळत असल्याच्या मुद्द्यावर या अधिसभेत वादळी चर्चा झाली.
विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात दुपारी बारा वाजता ही सभा सुरू झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के तर सचिवपदी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील होते.
‘विकास आघाडी’चे मधुकर पाटील यांनी विद्यापीठातील काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार केली काय?, शिक्षण सहसंचालक कार्यालयात अद्याप किती वेतन निश्चिती प्रकरणे प्रलंबित आहेत? हे प्रश्न विचारले. अमरसिंह रजपूत यांनी विद्यापीठातील प्रत्येक अधिविभागातील राजकारण, वाद थांबवून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याची मागणी उपप्रश्नातून केली. या प्रश्नांना कुलगुरू, कुलसचिव, सदस्य धैर्यशील पाटील यांनी उत्तरे दिली. त्यातच डॉ. एस. डी. डेळेकर यांनी वेतन निश्चितीच्या प्रकरणाचा मुद्दा मांडत प्रशासनाकडून योग्य माहिती मिळत नसल्याचे सांगितले. त्यावर सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रशासनाकडून संदिग्ध उत्तरे, चुकीची, दिशाभूल करणारी माहिती मिळत असल्याचे सांगत, एल. जी. जाधव यांनी हक्कभंग स्थगन प्रस्ताव सादर केला तसेच अधिसभा रद्दची मागणी केली. त्यावर प्रशासनाने कोणतीही खोटी माहिती दिलेली नाही, लेखी उत्तरे कागदपत्रांच्या आधारे दिली आहेत, दिशाभूल करण्याचा प्रश्न नसल्याचे सांगत कुलगुरूंनी स्थगन प्रस्ताव नाकारला. त्यावर ‘विकास आघाडी’च्या मधुकर पाटील, अमरसिंह रजपूत, भारती पाटील, संजय जाधव आदी सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर सभागृहाबाहेर प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.
दरम्यान, विहीत मुदतीत सादर केलेले प्रश्न नाकारण्याचे कारण ‘सुटा’ सदस्यांनी विचारले. पण, त्याबाबत चर्चा होणार नाही, असे कुलगुरूंनी सांगितले. त्यावर ‘सुटा’च्या अशोककुमार पाटील, इला जोगी, निलकंठ खंदारे, मनोज गुजर, राजेंद्र थोरात, अलका निकम यांनी प्रश्नोत्तरांच्या तासावर बहिष्कार टाकला. प्रश्नोत्तराच्या तासात विकास आघाडी, ‘सुटा’ने सभात्याग करण्याची घटना पहिल्यांदाच घडली.