उष्णजल प्रक्रियेचा अहवाल रखडला

By Admin | Updated: May 12, 2015 23:42 IST2015-05-12T22:26:17+5:302015-05-12T23:42:40+5:30

हापूसची परदेशवारी : यंदा वाशी मार्केटचा आधार...

Reports of torrential processes | उष्णजल प्रक्रियेचा अहवाल रखडला

उष्णजल प्रक्रियेचा अहवाल रखडला

रत्नागिरी : आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी उष्णजल प्रक्रियेबाबत अद्याप संशोधन सुरूच आहे. फळमाशीचे कारण देत युरोपिय देशांनी गतवर्षी आंबा निर्यातीवर बंदी घातली होती. यावर्षी उष्णजल प्रक्रियेची अट घालून निर्यातीवरील बंदी उठविण्यात आली. मात्र, अद्याप उष्णजल संशोधन पूर्ण न झाल्यामुळे बाष्पजल प्रकिया करून आंबा निर्यात सुरू आहे.
आंबा हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. शिवाय राष्ट्रीय फळ म्हणून त्यास प्रसिध्दी मिळाली आहे. फळाची गोडी, चव, स्वाद, रंग, आकार आदी गुणवैशिष्ट्यांमुळे कोकणातील आंब्याची हापूस जात जगामध्ये सरस ठरली आहे. स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ही जात लोकप्रिय आहे. आंब्यावर एक तास ४८ अंश सेल्सिअस उष्णजल प्रक्रिया केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात, असे मत संशोधकांनी वर्तविले होते. बैगनपल्ली, बदामी, तोतापुरी, केशरसारख्या जातीच्या आंब्याची साल जाड असल्याने या आंब्यासाठी संबंधित प्रक्रिया योग्य आहे. मात्र, हापूस आंब्याची साल पातळ असल्याने संबंधित प्रक्रियेमुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पणन मंडळामध्ये संशोधन सुरू करण्यात आले आहे.
एप्रिलअखेरीस फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. परंतु मार्चपासून संशोधन सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी पेरू आणून, सडविण्यात आले आहेत. फळमाशी अंडकोषातून बाहेर पडली असली तरी झाडावरील आंब्यावर त्याचा प्रादुर्भाव झालेला नाही. संशोधन अद्याप अपूर्ण असल्यामुळे आंब्यासाठी बाष्पजल प्रक्रिया वापरण्यात येत आहे.
युरोपीय देशांनी यावर्षी काही अटी ठेवत निर्यातीवरील बंदी उठवली. निर्यातीसाठी उष्णजल प्रक्रियेला सुरूवातीला मान्यता देण्यात आली होती. मात्र, संशोधन पूर्ण होऊ शकलेले नसल्याने बाष्पजल प्रक्रियेला मान्यता देण्यात आली. वाशी येथे बाष्पजल प्रक्रिया युनिट आहे. वाशीतून युरोपला आंबा पाठवताना बाष्पजल प्रक्रिया करून पाठवली जात आहे. बाष्पजल प्रक्रियेमध्ये साडेसत्तेचाळीस अंश सेल्सिअस इतके तापमान आंब्यास दिले जाते. नंतर थंड पाण्याव्दारे हळूहळू तापमान खाली आणले जाते. त्यामुळे फळमाशीच्या अळ्या मरून जातात. वाशी मार्केटमधील आंब्यावर उष्णजल प्रक्रिया करून आंबा युरोपीय देशात पाठवण्यात येत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गतूनही युरोपला आंबा पाठवताना वाशी मार्केटमधून उष्णजल प्रक्रिया केली जाते.
मॉरिशस, न्युझीलंड, युरोप, अमेरिका, जपान आदी देशातून आंब्याला मागणी होत आहे. अवकाळीमुळे जिल्ह्यातील २० हजार ५१८.३० हेक्टर क्षेत्रावरील आंबापीक नष्ट झाले. शिवाय अद्याप अधूनमधून पडत असलेल्या वादळी पावसामुळेही आंबा पिकावर परिणाम होत आहे. निर्यातीला मागणी असूनही त्या प्रमाणात पुरवठा होत नाही.
उष्णजल प्रक्रिया अहवाल लांबल्याने बाष्पजल प्रक्रिया ग्राह्य धरली जात आहे. आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्यात आला आहे. २५ मेपर्यंत आंबा हंगाम चालेल, असा अंदाज शेतकरी वर्तवित आहेत. हंगाम संपला तरी उष्णजल प्रक्रिया अहवालास प्रतीक्षा करावी लागली आहे. जूनपर्यंत संशोधन पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णजलचा अहवाल आता पुढील वर्षीच्या हंगामासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)



आता पुढील वर्षी...
फळमाशीचे कारण देत मागील वर्षी युरोपीयन देशांनी हापूस नाकारला होता. त्यावर उष्णजल प्रक्रियेचा पर्याय पुढे आला. मात्र, ज्याठिकाणी आंबा पिकतो, त्याठिकाणी अद्याप ही सुविधा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे मुंबईतील वाशी मार्केटमधून बाष्पजल प्रक्रिया पूर्ण करून यंदा हापूस युरोपीय देशात पाठवण्यात येत आहे. रत्नागिरीत ही सुविधा होणार कधी ?


आता पुढील वर्षी...
जूनपर्यंत संशोधन पूर्ण होण्याची शक्यता.
उष्णजलचा अहवाल आता पुढील वर्षीच्या हंगामासाठी उपयुक्त ठरणार.
वाशी मार्केटमधील आंब्यावर उष्णजल प्रक्रिया करून आंबा युरोपीय देशात पाठवण्यात येतो.
रत्नागिरी, सिंधुदुर्गतूनही युरोपला आंबा पाठवताना वाशी मार्केटमधून केली जातेय उष्णजल प्रक्रिया.

Web Title: Reports of torrential processes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.