रेशन ग्राहकांचा २६ मार्चला सरकारविरोधात ‘एल्गार’
By Admin | Updated: February 27, 2015 00:17 IST2015-02-26T23:54:25+5:302015-02-27T00:17:10+5:30
मुंबईत निघणार मोर्चा : रेशन बचाव प्रतिनिधींच्या राज्यस्तरीय बैठकीत निर्णय

रेशन ग्राहकांचा २६ मार्चला सरकारविरोधात ‘एल्गार’
कोल्हापूर : रेशन व्यवस्थेबाबत सरकारच्या चुकीच्या धोरणाला विरोध करण्यासाठी २६ मार्चला रेशन ग्राहकांचा राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा निर्णय गुुुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत झाला. यासाठी मोहिमा, सभा, संमेलने, परिषदा, मेळावे या माध्यमांतून जनजागरणाकरिता सूत्रबद्ध कार्यक्रम आखण्याचेही ठरले. टाटा समाज विज्ञान अकादमी येथे राज्यातील रेशन चळवळीतील २२ संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून रेशन बचाव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत यादव उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शोषित जनआंदोलन समितीच्या अध्यक्षा उल्का महाजन होत्या.दिवसभर चाललेल्या बैठकीत सरकारच्या रेशन धोरणावर सविस्तर चर्चा होऊन विविध महत्त्वपूर्ण निर्णय झाले. यामध्ये २६ मार्चला मुंबईत रेशन ग्राहकांचा राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येईल. सकाळी ११ वाजता हा मोर्चा सुरू होऊन तो कोतवाल गार्डन ते चैत्यभूमी असा जाईल. शांताकुमार समितीच्या शिफारशी रद्द कराव्यात. रोख अनुदानाऐवजी रेशनवर धान्य पाहिजे. केशरी कार्डावरील धान्याची तरतूद झालीच पाहिजे. अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना १२ किलो धान्य मिळाले पाहिजे, यांचा समावेश आहे.
सरकारच्या रेशन धोरणाविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी जनतेची राज्यव्यापी चळवळ उभी करणे गरजेचे असल्याचे चंद्रकांत यादव यांनी सांगितले. त्यानुसार जनजागरणासाठी मोहिमा, सभा, संमेलने, परिषदा, मेळावे या माध्यमांतून सूत्रबद्ध कार्यक्रम आखला जावा, असेही त्यांनी सांगितले. त्याला सर्वांनी एकमुखी मान्यता दिली. दरम्यान, कोल्हापुरातील रेशनविरोधी निघालेल्या भव्य मोर्चाची दखल राज्यभरातील संघटनांनी घेतली.
यावेळी रेशन कृती समितीचे सुरेश सावंत, अन्न अधिकार अभियानाच्या मुक्ता श्रीवास्तव, जनहित मोर्चाचे रिची बऊ, न्यायालयनियुक्त सल्लागार समितीचे प्रतिनिधी डॉ. अण्णा शिरवाडकर, ‘मूव्हमेंट चीफ अॅँड जस्टिस’चे शब्बीर देशमुख, आदींसह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)