पावसाची दडी अन् नदीत उडी
By Admin | Updated: July 10, 2015 21:45 IST2015-07-10T21:45:00+5:302015-07-10T21:45:00+5:30
महसूल यंत्रणा निवडणूक कामात : पाऊस नसल्याने शिरोळ तालुक्यामध्ये वाळू उपशाला पुन्हा जोर

पावसाची दडी अन् नदीत उडी
संदीप बावचे- शिरोळ -‘वाळूचे आगर’ समजल्या जाणाऱ्या शिरोळ तालुक्यात एकीकडे नदीत कमी झालेले पाणी, त्यातच पावसाने मारलेली दडी पाहून वाळू उपसाधारकांनी पुन्हा नदीत उडी घेतली आहे. एरवी पाऊस किंवा पुरामुळे बंद होणारा वाळू उपसा यंदा मात्र पाऊस नसल्यामुळे पुन्हा सुरू झाला आहे. यामुळे वाळू उपसाधारकांची कोट्यवधीची चांदीच चांदी झाली आहे.
शिरोळ तालुक्याला कृष्णा नदीचे विशाल पात्र लाभले आहे. पावसाळा संपला व नदीचे पाणी कमी झाले की, येथे वाळू उपसाधारकांची परवाना घेऊन वाळूचे डेपो मारण्याची लगबग उडते. सप्टेंबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत परवाना मिळाला आहे. यामुळे पावसाच्या कृपेवर व उपलब्ध मजुरांचा ताळमेळ घालून वाळू उपसा केला जातो. यावर्षी मात्र वरुणराजा शेतकऱ्यांवर रूसला आहे, तर वाळू उपसाधारकांवर चांगलाच फिदा झाला आहे. जून महिन्यात सुरुवातीला पावसाने जोरदार आगमन केले. मात्र, जुलै महिन्यात पावसाने दडी मारली आहे. पाऊस न पडल्याने व नदीची पाणीपातळी कमी झाल्याने उपसा करून मोठ्या प्रमाणात वाळूचे ढीग दिसू लागले आहेत. तालुक्यात नदीपलीकडील गावांमध्ये अनेक ठिकाणी सध्या जोरात वाळू उपसा सुरू आहे. एक वाळू उपसाधारक दिवसाला लाखो रुपयांची वाळू उपसा करतो. याचा हिशेब केल्यास कोट्यवधी रुपयांच्या घरात हा हिशेब जातो. एरवी शिरोळ आणि त्या ठिकाणी असणारा बेकायदा वाळू उपसा हा नेहमीच चर्चेचा व वादाचा विषय ठरला असताना पावसाने दडी मारलेली पाहून ठेकेदारांनी नदीत उडी घेऊन कोट्यवधी रुपयांचे वाळूचे डेपो अशाच पद्धतीने मारले आहेत. सध्या उदगांव, चिंचवाड, घालवाड, औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद, गणेशवाडी, आलास, राजापूर आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. ३१ सप्टेंबरपर्यंत वाळू उपसा करण्याची अंतिम मुदत असल्याने वाळूचा उपसा करून तिचे डेपो मारण्यात उपसाधारक मग्न असल्याचे चित्र आहे. एकीकडे वायुवेगाने वाढणारी सिमेंटच्या इमारतींची जंगले, तर दुसरीकडे वाढलेल्या वाळूच्या किमती या बाबी वाळूचा साठा करून व टंचाई करून वाळू उपसाधारकांचे उखळ पांढरे करणार यात तीळमात्र शंका नाही.
अधिकारी कामात, वाळू तस्करी जोमात
शिरोळ तालुक्यात बेसुमार वाळू उपसा सुरू झाला आहे. काही ठिकाणी बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे.
सध्या महसूल यंत्रणा ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामात गुंतली आहे. नेमका याचा फायदा घेऊन वाळू तस्करीला जोर आला आहे.
स्थानिक तलाठी व मंडल अधिकारी निवडणूक कामातून याकडे लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.