राधानगरी ग्रामपंचायत राबविणार सौर ऊर्जा प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:20 IST2021-01-14T04:20:22+5:302021-01-14T04:20:22+5:30
राधानगरी : गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या नळ योजनेच्या वीज बिलावर होणारा प्रचंड खर्च कमी करण्यासाठी राधानगरी ग्रामपंचायत सौर विजेचा ...

राधानगरी ग्रामपंचायत राबविणार सौर ऊर्जा प्रकल्प
राधानगरी : गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या नळ योजनेच्या वीज बिलावर होणारा प्रचंड खर्च कमी करण्यासाठी राधानगरी ग्रामपंचायत सौर विजेचा वापर करणार आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या वतीने हा प्रकल्प उभारण्यात येत असून, जिल्हा नियोजन मंडळाकडून 27.81 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा प्रकल्प राबविणारी कोल्हापूर विभागातील ही पहिली ग्रामपंचायत ठरणार आहे.
विजेच्या वाढत्या दरामुळे पाणी योजनेसाठी मोठा खर्च होतो. पाणीपट्टीच्या दरात मर्यादा असल्याने यातील उत्पन्न व खर्च याचे प्रमाण व्यस्त असते. त्यामुळे विजेची लाखो रुपये थकबाकी आहे.
तालुक्याचे ठिकाण व पूर्वीचा वाड्या-वस्त्यांचा विस्तारही मोठा आहे. राधानगरी धरणातून थेट पाणीपुरवठा योजना सुरू झाली असली तरी बहुतांश वस्ती धरणापेक्षा उंचवट्यावर आहे. परिणामी मोटारपंपाचा वापर करावाच लागतो. त्यामुळे दरमहा एक लाखाच्या घरात वीज बिल येते. यासह कर्मचारी पगार, देखभाल यासाठीही मोठा खर्च होतो.
त्यामुळे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. 50 किलोवॅट क्षमतेच्या या प्रकल्पावर नदीतील पाणी उपसा करणारे 25 व 15 एचपीचे दोन पंप चालतील. पावसाळ्याचे काही महिने सोडले तरी किमान 8 ते 9 महिने याद्वारे वीज मिळेल. त्यामुळे वर्षाला किमान आठ लाख रुपये वाचणार आहेत. एकदा उभारणी झाल्यावर किमान 25 वर्षे कसलाही खर्च येणार नाही. जिल्हा नियोजन मंडळाकडून यासाठी 27 लाख 81 हजार 236 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
प्रतिक्रिया
- वीज बिलावर मोठा खर्च होतो. प्रसंगी एखादे विकास काम बाजूला ठेवून तो करावा लागतो. त्यामुळे ग्रामपंचायतीने हा प्रकल्प हाती घेतला आहे. यातून शिल्लक राहणाऱ्या निधीतून गावातील विकास कामे करता येतील. यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांची मोठी मदत झाली. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व स्थानिक नेतेमंडळी यांचेही सहकार्य लाभले.
कविता दीपक शेट्टी सरपंच, राधानगरी.