प्रधानमंत्री सुरक्षा योजनेत दहा लाखांवर खाती
By Admin | Updated: June 14, 2016 00:18 IST2016-06-13T23:44:41+5:302016-06-14T00:18:30+5:30
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : वारसांना अडीच कोटींची मदत; बचत गटासाठी प्रशिक्षण

प्रधानमंत्री सुरक्षा योजनेत दहा लाखांवर खाती
कोल्हापूर : प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि अटल विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात १० लाख ८ हजार ६७१ खाती उघडण्यात आली असून, यापुढील काळात सर्व बँकांनी या विमा योजनांतर्गत अधिकाधिक खाती उघडण्यात सक्रिय पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी शुक्रवारी केले.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी सैनीबोलत होते. बैठकीस आमदार डॉ. सुजित मिणचेकर, रिझर्व्ह बँकेचे सहायक महाप्रबंधक पी. एस. पराटे, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक, बँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक बी. के. आरसेकर, जिल्हा मध्यवर्र्ती बँकेचे कार्यकारी संचालक प्रतापसिंह चव्हाण, प्रकल्प संचालक डॉ. हरीश जगताप, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक एम. जी. कुलकर्र्णी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व बॅँकांचे जिल्हा समन्वयक आणि अन्य विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ५१ हजार ७४० खाती उघडण्यात आली. मार्च २०१६ अखेर १२ दावे मंजूर करण्यात आले. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत तीन लाख ४७ हजार १८९ खाती उघडण्यात आली. आतापर्यंत ११३ दावे मंजूर करून संबंधितांच्या वारसांना अडीच कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले. या योजनांच्या नूतनीकरणाचे काम सर्व बँकांमध्ये सुरू असून, खातेदारांनी आपल्या बचत खात्यामध्ये पुरेशी शिल्लक ठेवून विमा योजनांचे नूतनीकरण करावे. जीवन ज्योती योजनेत दावा पात्रता ही ४५ दिवसांची करण्यात आल्याने पॉलिसी सुरू झाल्यापासून ४५ दिवसांनंतर दावा मंजूर करण्यात येईल. या सर्व योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी अधिकाधिक बचत गटांना यात सामावून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सैनी यांनी केले. अटल विमा योजनेंतर्गत ९ हजार ७४२ खाती उघडण्यात आली. याबरोबरच पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत जिल्ह्यात ५ लाख १३ हजार ८५४ खाती उघडण्यात आली. ३ लाख ६२ हजार ३१६ खात्यांसाठी रूपे कार्ड प्रदान करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील उद्योजकांना २३ हजार २७१ खात्यांमध्ये अर्थसाहाय्य करण्यात आले. यामध्ये शिशू योजनेंतर्गत १९ हजार ८२० खात्यांमध्ये किशोर योजनेंतर्गत २ हजार ७५१ खात्यांमध्ये आणि तरुण योजनेंतर्गत ७०० खात्यांमध्ये अर्थसाहाय्य करण्यात आले.
जिल्ह्यात बचत गटांच्या महिलांसाठी आर-सेटी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले असून, या केंद्रामार्फत २०१५-१६ मध्ये घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
बँकांतील ठेवींमध्ये १२०० कोटींची वाढ
अग्रणी जिल्हा व्यवस्थापक एम. जी. कुलकर्र्णी यांनी सांगितले की जिल्ह्यातील प्राथमिकता सेवा क्षेत्राकरिता ५०४० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. मार्च २०१६ साठी दिलेल्या उद्दिष्टाच्या ५१२४.६४ कोटींचा वित्तपुरवठा प्राथमिकता क्षेत्राकरिता जिल्ह्यातील सर्व बँकांनी केला.
या वर्षामध्ये जिल्ह्यातील सर्व बॅँकांच्या ठेवींमध्ये एक हजार १९६ कोटी वाढ होऊन त्या १९ हजार ३९१ कोटी इतक्या झाल्या आहेत. कर्जामध्ये ९६३ कोटींची वाढ होऊन जिल्ह्यामध्ये प्राथमिकता क्षेत्रासाठी दिलेल्या कर्जाची रक्कम १५ हजार ७६९ कोटी इतकी झाली.
सन २०१६-१७ करिता वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामध्ये पीककर्जासाठी २ हजार ६८८ कोटी इतके उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.
आर्थिक साक्षरता केंद्र
कोल्हापूरमध्ये आर्थिक साक्षरता केंद्र स्थापन करण्यात आले असून, या केंद्रामार्फत वेगवेगळ्या गावांमध्ये बँकिंग साक्षरतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आर्थिक साक्षरतेसाठी महिन्यातून किमान एकवेळ ग्रामीण भागात कार्यक्रम घेणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी सैनी यांनी यावेळी स्पष्ट केले.