लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वीजतारांवर आकडे टाकून किंवा मीटरमध्ये फेरफार करून विजेचा वापर करणाऱ्यांना दणका देत महावितरणने वीजचोरीविरोधात वेगाने मोहीम सुरू केली आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये गेल्या दीड महिन्यात नियमित व विशेष मोहिमेमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १८७६ ठिकाणी ४ कोटी ५७ लाख रुपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. या वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याचे कलम १३५ प्रमाणे फौजदारी कारवाई सुरू केली आहे. ५६६ प्रकरणांमध्ये ९९ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. वीजचोरीविरोधात मोहिमेला आणखी वेग देण्यासाठी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे हे स्वतः या मोहिमेत विविध ठिकाणी भेटी देऊन महावितरणच्या पथकांना मार्गदर्शन करीत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडहिंग्लज, इचलकंरजी, जयसिंगपूर, कोल्हापूर शहर तसेच ग्रामीण एक व दोन या विभागांमध्ये वीजचोरीचे प्रकार उघड करण्यात आले. जिल्ह्यात ३५ ठिकाणी ५ लाख २० हजार रुपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आल्या. सर्वच ३५ प्रकरणांत ५ लाख २० हजार रुपयांचा दंड व वीज बिलांची वसुली करण्यात आली.
वीजचोरी प्रकरणात ज्यांनी दंडात्मक रकमेसह चोरीच्या वीज वापराप्रमाणे संपूर्ण बिलाची रक्कम भरली नाही, तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. विद्युत अपघाताचा धोका असणाऱ्या विजेची चोरी करण्याऐवजी अधिकृत वीजजोडणी घेऊन मोठ्या रकमेची दंडात्मक किंवा फौजदारी कारवाईमधील कारावासाची शिक्षा टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
फोटो : ०१०२२०२१-कोल-महावितरण
पश्चिम महाराष्ट्रात महावितरणने वीजचोरीविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. प्रादेशिक संचालक अंकुश नाळे हे विविध ठिकाणी भेटी देऊन वीजचोरीच्या घटनांची पाहणी करीत आहेत.