कोल्हापूर : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या खुनाचा मुख्य सूत्रधार आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला गुन्हेगार बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर अजूनही पोलिस खात्याचा जावई आहे काय? असा संतप्त सवाल अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी उपस्थित केला आहे.कुरुंदकर याने तुरुंगातून अर्जित रजा (पॅरोल) मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची प्रत देण्यास राजारामपुरी पोलिसांनी नकार दिल्याने गोरे यांनी मंगळवारी (दि. १०) संताप व्यक्त केला. तसेच, कुरुंदकरला पॅरोल मिळण्यास विरोध दर्शवला.बडतर्फ पोलिस निरीक्षक कुरुंदकर हा अश्विनी यांच्या खूनप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. २० जून रोजी कोल्हापुरात त्याच्या मुलाचे लग्न होणार आहे. त्यासाठी अर्जित रजा मिळावी, अशी विनंती त्याने कारागृह प्रशासनाकडे केली आहे. त्यानुसार कारागृह प्रशासनाने राजारामपुरी पोलिसांना पत्र पाठवून लग्न कुठे आहे?, कधी आहे? याचे तपशील मागवले आहेत. तसेच, त्या गुन्ह्यातील फिर्यादी राजू गोरे यांचा जबाब घेऊन पाठवण्याची विनंती केली आहे.
कुरुंदकर तुमचा शत्रु, आमचा नाहीराजारामपुरी पोलिसांनी राजू गोरे यांना जबाब नोंदवण्यासाठी मंगळवारी बोलवले होते. त्यांनी जबाब देण्यापूर्वी कुरुंदकर याच्या अर्जाची प्रत मागितली. मात्र, पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी प्रत देण्यास नकार दिला. कुरुंदकर हा तुमचा शत्रू असेल. आमचा शत्रू नाही, असे सुनावले. यावर गोरे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेत संताप व्यक्त केला.यापूर्वी मुंबई पोलिसांनी वारंवार आरोपी कुरुंदकर आणि त्याच्या सहकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतरही पोलिस त्याला मदत करण्यासाठी धडपडत आहेत. त्याचा अर्ज लपवत आहेत, असा आरोप गोरे यांनी केला.
सुपेकरांशी लागेबांधे?वरिष्ठ पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकर आणि कुरुंदकर कुटुंबीय एकमेकांच्या संपर्कात होते. कारागृह विभागाची जबाबदारी सांभाळताना गुन्हेगार अभय कुरुंदकर आणि त्याच्या पोलिस अधिकारी भावाशी सुपेकरांचा संपर्क आला असावा. कुरुंदकरच्या रजेच्या अर्जात सुपेकरांचा सहभाग असावा, अशी शक्यता गोरे यांनी व्यक्त केली.
कुरुंदकर कुटुंबाकडून धोकागुन्हेगार अभय कुरुंदकर याचा जावई पोलिस उपअधीक्षक आहे. कुरुंदकरच्या मुलीने पनवेल न्यायालयाच्या आवारात धमकावले होते. त्यामुळे या कुटुंबाकडून बिद्रे-गोरे कुटुंबाला धोका असल्याची तक्रार राजू गोरे यांनी केली आहे.