आजऱ्याजवळील राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:24 IST2021-09-25T04:24:43+5:302021-09-25T04:24:43+5:30
संकेश्वर ते दोडामार्ग हा रस्ता आजरा व गडहिंग्लजमधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग ...

आजऱ्याजवळील राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे
संकेश्वर ते दोडामार्ग हा रस्ता आजरा व गडहिंग्लजमधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग दुरुस्तीसाठी कोणताही निधी खर्च करीत नाही. राष्ट्रीय महामार्गचे कार्यालय कोल्हापुरात आहे व रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी व पाहणी करून निधी लावण्यासाठी अधिकाऱ्यांकडे वेळच नाही.
आजरा शहरातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर भादवण तिट्टा ते आंबोली हद्दीपर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. माती टाकून या रस्त्याची दुरुस्ती करण्याऐवजी डांबरीकरणातून खड्डे बुजविणे गरजेचे आहे.
अतिवृष्टीचा हा प्रदेश असल्याने व गोव्यासह कोकणात जाणाऱ्या नागरिकांना जवळचा असणारा हा रस्ता सध्या खड्ड्यांमुळे नादुरुस्त झाला आहे. १२५ वर्षांची साक्ष देणाऱ्या व्हिक्टोरिया पुलावरही खड्डे पडल्यामुळे या पुलाला धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावर खड्ड्यांचे जाळे तयार झाले आहे.
वाहनधारकांना रस्ता सापडत नाही. रस्त्यावर एक ते दोन फुटाचे खड्डे तयार झाले आहेत. मात्र अधिकारी रस्त्यावरील खड्ड्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहेत. यापूर्वी नागरिकांनी आजरा तहसीलदार यांना भेटून रस्त्याच्या दुरुस्तीबाबत व खड्डे बुजविण्याबाबत लक्ष वेधले आहे. अधिकाऱ्यांनी गणपतीपूर्वी खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले. मात्र गणपती झाला, दसरा आला तरीही रस्त्यावरील खड्डे आहे तसेच आहेत. नागरिकांच्या निवेदनालाही राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे.
फोटो ओळी : आजरा-आंबोली-गडहिंग्लज शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे.
क्रमांक : २४०९२०२१-गड-०९