पंचगंगा पात्राबाहेर

By Admin | Updated: July 11, 2016 01:25 IST2016-07-11T01:25:31+5:302016-07-11T01:25:31+5:30

दुसऱ्या दिवशीही झिम्माड पाऊस : गगनबाबड्यात १८९.५० मि.मी.; शहरात झाड पडल्याने एक जखमी

Out of Panchganga Patra | पंचगंगा पात्राबाहेर

पंचगंगा पात्राबाहेर

 कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या झिम्माड पावसामुळे रविवारी पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे पाणी पाहण्यासाठी सायंकाळी आबालवृद्धांची उत्सुकतेपोटी एकच गर्दी झाली. जिल्ह्यात सर्वत्र सुरू असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने राजाराम बंधाऱ्याची पातळी ३२ फुटांपर्यंत गेली. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक गगनबाबडा तालुक्यात १८९.५० मिलिमीटर पाऊस पडला. दरम्यान, शहरातील ८ नं. शाळेच्या परिसरात झाड उन्मळून झालेल्या दुर्घटनेत एकजण जखमी झाला आहे.
मुसळधार पावसाने रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही आपला जोर कायम ठेवला. त्यामुळे शहरात जागोजागी तळी साचली. पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन ते शहरातील नदीघाटाशेजारील गायकवाड पुतळा परिसरात आले. दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जावे लागलेल्या कोल्हापूरवासीयांनी पाणी नदीपात्राबाहेर आल्याचे समजताच ते पाहण्यासाठी सायंकाळी घाट परिसरात एकच गर्दी केली. आबालवृद्धांनी या पाण्याचा मनसोक्त आनंद लुटला; तर काहीजणांनी या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी येथे मित्र तसेच कुटुंबीयांसमवेत सेल्फी घेतले. दिवसभर सुरू असलेल्या पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणी साठले. मस्कुती तलाव ते शिंगणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच उत्तरेश्वर पेठ येथील जुना श्ािंगणापूर जकात नाका येथे पंचगंगा नदीच्या पाण्याने वेढा घातल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली. शिवाजी पेठेतील ८ नं. शाळा परिसरात जोरदार पावसाने झाड उन्मळून पडून झालेल्या दुर्घटनेत एकजण जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच या ठिकाणी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलासह आपत्ती व्यवस्थापन विभागाने मदतकार्य केले. शाहूपुरीतही झाड उन्मळून पडले; पण सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.
जिल्ह्यातही झिम्माड पावसाने सर्वत्र पाणी-पाणी केले. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसाने नद्यांच्या पातळीत वाढ होऊन कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी रविवारी सायंकाळी ३२ फुटांवर पोहोचली आहे. कोदे धरणक्षेत्रात २१३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, हे धरण १०० टक्के भरल्याने येथून पाण्याचा प्रतिसेकंद ५६५ घनफूट विसर्ग सुरू आहे.
तीन ठिकाणी झाडे कोसळली
शहरात रविवारी दिवसभरात तीन ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. शिवाजी पेठेतील ८ नंबर शाळेनजीक रस्त्याकडेचे मोठे झाड उन्मळून रस्त्यावर पडले. त्यावेळी तेथून निघालेला पादचारी किरकोळ जखमी झाला. हे झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली. महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाने तातडीने घटनास्थळी येऊन कटरच्या साहाय्याने हे झाड तोडून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. याशिवाय न्यू शाहूपुरी येथे हॉटेल मराठा नजीकही मोठे झाड उन्मळून रस्त्यावर पडले. तर शिवाजी पार्क परिसरात सत्यसाई अपार्टमेंटनजीक रस्त्याकडेचे मोठे झाड उन्मळून पडले. यामुळे शेजारील कुंपणाची भिंत कोसळून नुकसान झाले. सुदैवाने या तिन्हीही घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
बावड्यातील त्र्यंबोलीनगरमध्ये घरांमध्ये पाणी
कसबा बावडा : गेले दोन दिवस सुरूअसलेल्या मुसळधार पावसामुळे येथील त्र्यंबोलीनगरमधील अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाणी ओसरण्याची वाट पाहण्याशिवाय या नागरिकांना काहीच करता येत नाही.लाईन बझार परिसरातील त्र्यंबोलीनगर हा परिसर सखल भागात आहे. या भागात सर्किट हाऊस, पोलिस लाईन, आदी ठिकाणच्या नाल्यांचे पाणी मोठ्या चॅनेलमधून येते. हे पाणी काही ठिकाणी मोठ्या पाईपलाईन पुढे न सरकल्याने रस्त्यावर आले. तेथून ते अनेक घरांमधून शिरले.
लग्नाचे मुहूर्त चुकले
रविवारी साडेबाराच्या सुमारास लग्नाचे मुहूर्त असल्याने शहरातील मंगल कार्यालयांमध्ये लगीनघाई सुरू होती. परंतु दिवसभराच्या झिम्माड पावसाचा परिणाम या लग्न सोहळ्यांवर झाल्याचे दिसले. चारचाकी वाहनांतून आलेल्या पाहुण्यांनाच लग्नाच्या मुहुर्ताच्या अक्षता मिळाल्याचे दिसत होते. मुसळधार पावसाने अनेकांना मुहूर्त चुकल्याने, नंतर दांपत्याची भेट घेऊन शुभेच्छा द्याव्या लागल्या.

३२ बंधारे पाण्याखाली
४जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ होऊन पंचगंगा, कासारी, कडवी, वारणा, तुळशी व भोगावती या नद्यांवरील ३२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
४पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर व भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, शिरगाव, खडक कोगे व सरकारी कोगे, तुळशी नदीवरील बीड, कासारी नदीवरील यवलूज, ठाणे, पुनाळ, तिरपण, कडवी नदीवरील पाटण, सवते, सावर्डे, शिरगाव, कोपार्डे, येल्लूर, भोसलेवाडी, वालूर, सुतारवाडी, जावळी, गोळसवडे, वारणा नदीवरील चिंचोली, माणगाव, कोडोली, तांदुळवाडी, शेणवडे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
घर, गोठा, गुऱ्हाळघरांची पडझड
मुसळधार पावसाने रविवारी जिल्ह्यातील शाहूवाडी, करवीर, आजरा तालुक्यांत घर, गुऱ्हाळघर व जनावरांच्या गोठ्यांची पडझड होऊन
१ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत तालुकास्तरावर पंचनामा करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे पाठविण्यात आला आहे. यामध्ये शिवाजी बापू बजागा (रा. बजागेवाडी, ता. शाहूवाडी) यांच्या घराची अंशत: पडझड होऊन ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. शिवाजी वासुदेव पाटील (रा. साबळेवाडी, ता. करवीर) यांचे गुऱ्हाळघर कोसळून ६० हजार रुपयांचे, मारुती दादू पाटील (रा. शिवारे, ता. शाहूवाडी) यांच्या घराची भिंत पडून २५ हजार रुपयांचे, रंगराव महादेव खोत (रा. सरुड, ता. शाहूवाडी) यांच्या घराची भिंत पडून ३० हजार रुपयांचे, संजय घोरपडे (रा. उत्तूर, ता. आजरा) यांचा जनावरांचा गोठा पूर्णपणे कोसळून ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
चोवीस तासांत तालुकानिहाय पाऊस मि.मी.
करवीर ८१.७२ कागल ६९.७१
पन्हाळा ९८.२८ शाहूवाडी १३०
हातकणंगले ३२.८७ शिरोळ ३७.५७
राधानगरी ७६.६७ गगनबावडा १८९.५०
भुदरगड ७५.६० गडहिंग्लज ५०.७१
आजरा ९१.२५ चंदगड ११०.१६
अपघातात तरूण ठार
गारगोटी : गारगोटी-कोल्हापूर महामार्गावर मडिलगे बुद्रुक बस स्टँडनजीक रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने गाडी झाडावर आदळली. यामध्ये कारचालक सुहास सुभाष कोठावळे (वय ३७, रा. पुष्पनगर, ता. भुदरगड) यांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री अकरा वाजता हा अपघात झाला. सुहास यांनी बुधवारी नवीन कार घेतली होती. याच गाडीच्या अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

राधानगरी ४६% भरले
धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कंसात एकूण साठा, सध्याचा साठा व टक्केवारी पुढीलप्रमाणे : राधानगरी धरण ३.८७ (८.३६१) टीएमसी इतके भरले असून, ४६ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्याखालोखाल दूधगंगा ५.३७ (२५.३९) टीएमसी भरले असून, २१ टक्के पाणीसाठा झाला आहे. तुळशी १.१४ (३.४७१) ३३ टक्के, वारणा १४.२७ (३४.४०) ४१ टक्के, दूधगंगा ५.३७ (२५.३९) २१, कासारी १.३१ (२.७७४) ४७, कडवी १.६८ (२.५१६) ६७ टक्के, पाटगाव १.३३ (३.७१६) ३६, कुंभी १.५५ (२.७१५) ५७, कोदे २१ (२१४) १०० टक्के.
‘पुनर्वसू’चा ‘सुख’वर्षाव!
मुंबई : जून महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने रविवारी पुनर्वसू नक्षत्राचा मुहूूर्त साधत राज्यावर ‘सुख’ वर्षाव केला. नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला असून, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत दोन दिवसांपासून जलधारा बरसत आहेत. पुणे जिल्ह्यात संततधार, खान्देशात भिज पाऊस सुरू आहे. तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे विदर्भातील नद्यांना पूर आले असून, गोसेखुर्दचे ३३ दरवाजे उघडावे लागले. नाशिकमध्ये तर गोदावरी दोन वर्षांनंतर प्रथमच दुथडी भरून वाहू लागल्याने मराठवाड्यातील जनता सुखावली आहे.

Web Title: Out of Panchganga Patra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.