आशावाद देतो जगण्याची उभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:55 AM2019-09-10T00:55:42+5:302019-09-10T00:55:46+5:30

चंद्रकांत कित्तुरे जी वनगाणे गात रहावे, पुढे पुढे चालावे, असे एक चित्रपटगीत आहे. आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येत असतात. ...

Optimism gives rise to survival | आशावाद देतो जगण्याची उभारी

आशावाद देतो जगण्याची उभारी

googlenewsNext

चंद्रकांत कित्तुरे
जी वनगाणे गात रहावे, पुढे पुढे चालावे, असे एक चित्रपटगीत आहे. आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येत असतात. संकटे येत असतात त्यांना सामोरे जावे. खचून जाऊ नये, असा संदेश या गाण्यातून दिला गेला आहे. त्याचप्रमाणे ‘दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल’ असा संदेश देणारे, आयुष्याचे सार सांगणारे, कसे जगावे हे सांगणारेही एक गाणे आहे. ही दोन्ही गाणी मानवाला जीवनाकडे आशावादी दृष्टिकोनातून पहावे असे सांगतात. हे अगदी खरे आहे. कारण माणसाने आशा सोडली तर जीवनात अर्थच राहात नाही. माणूस निराशावादी बनतो. नको नको ते विचार मनात येऊ लागतात. त्यातून काहीतरी विपरीत घडण्याची, घडवले जाण्याची शक्यताच अधिक असते, त्यामुळे माणसाने कोणत्याही घटना, घडामोडींकडे पाहताना कठीण प्रसंगाला तोंड देताना आशावादी राहावे. तरच त्यातून मार्ग सापडतो. अशा प्रसंगात धीर देणारे, पाठीशी रहाणारेही भेटतात. यामुळे एक ना एक दिवस आपण त्या कठीण प्रसंगातून बाहेर पडतो. कोणाला हा मार्ग लगेच सापडतो तर कोणाला उशिरा. पण मार्ग सापडतो हे निश्चित. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे आज (मंगळवार) आत्महत्या प्रतिबंधक दिन आहे. आत्महत्या करू नये, यासाठी प्रबोधन, समुपदेशन हे मार्ग आहेत.
एका अहवालानुसार सर्वाधिक आत्महत्या २१ ते ४० वयोगटातील लोक करतात. खरे तर ऐन तारुण्याचा हा काळ असतो. आयुष्य घडविण्याचे, करियर करण्याचे हेच दिवस असतात. सध्याच्या गतिमान जगात सगळ्यांनाच एखाद्या गोष्टीचे झटपट निष्कर्ष किंवा फळ हवे असते. ते मिळाले नाही तर हे तरुण, तरुणी निराशेच्या गर्तेत जातात. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग लवकर नाही सापडला तर आत्महत्येचे विचार मनात येऊ लागतात. काहीजण हे टोेकाचे पाऊल उचलतात आणि आयुष्य संपवून टाकतात. मनात सदैव आशावाद बाळगला तरच हे कुठेतरी थांबू शकेल.
सध्या भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेची जगभर चर्चा सुरू आहे. ही मोहीम शेवटच्या काही मिनिटात अपयशी ठरली. विक्रम लॅन्डर सुरक्षितपणे चंद्रावर उतरू शकले नाही. तरीही आधीचे सर्व टप्पे पूर्ण करून चंद्रापर्यंत जाणे ही काही सोपी गोष्टी नाही. शिवाय या यानाचे आॅर्बिटर चंद्राभोवती फिरते आहे. त्याने विक्रम लॅन्डरचे छायाचित्रही पाठवले आहे. ते एका कलंडलेल्या स्थितीत दिसते. त्याच्याशी संपर्क साधण्याचे इस्त्रोचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत इस्त्रो खूपच आशावादी आहे. पंतप्रधानांसह संपूर्ण देश या घटनेनंतर शास्त्रज्ञांच्या पाठीशी राहिला. यामुळे या शास्त्रज्ञांची उमेद वाढली. आशावाद कायम राहिला. त्यातूनच मोठ्या शर्थीने ते विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत अभूतपूर्व असा महापूर येऊन गेला. लाखो कुटुंबांचे संसार पाण्यात बुडाले, वाहून गेले. शेतीचे प्रचंड नुकसान झाले. महापुरात उद्ध्वस्त झाल्यामुळे आत्महत्या केल्याच्या किंवा नुकसान पाहून बसलेल्या धक्क्याने मृत्यू होण्याच्या एकदोन घटना घडल्या. हे व्हायला नको होते. जसा महापूर आला तसाच मदतीचाही महापूर आला. संकटग्रस्तांच्या पाठीशी समाज कसा उभा राहतो याचे चित्र सर्वत्र दिसले. सरकारनेही मदतीचा हात दिला. त्यामुळे हे पूरग्रस्त आता सावरताहेत. पुन्हा सुरू झालेल्या पावसाने त्यांना पुन्हा एकदा धडकी भरवली होती. पण हा पाऊसही आता कमी होत असल्याचे दिसते. आयुष्यभर काबाडकष्ट करून उभा केलेला संसार पुन्हा नव्याने उभा करण्याची वेळ अनेक कुटुंबांवर आली आहे. पण त्यांनी आशा सोडलेली नाही; नव्या जिद्दीने ते उभा राहण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्यातील दुर्दम्य आशावादच त्यांना हे करण्यास प्रवृत्त करतो आहे. हा आशावाद आणि त्याला दिलेली प्रयत्नांची जोड यातूनच ते निश्चितपणे यशस्वी होणार आहेत. फक्त त्याला काही काळ जावा लागेल येवढेच.
सध्या देशात मंदीचे वातावरण आहे. आॅटोमोबाईल क्षेत्रात तर आजपर्यंतची सर्वांत मोठी मंदी असल्याचे सांगितले जाते. आॅगस्ट महिन्यात वाहन विक्रीत सुमारे
२४ टक्के घट झाल्याचे सांगितले जाते. याशिवाय अन्य उद्योगांनाही मंदीची झळ बसत आहे. यामुळे अनेक कारखाने बंद पडू लागले आहेत. यामुळे कामगारवर्गावर बेकारीची कुºहाड कोसळली आहे. यामुळे उद्योजकांसह कामगारही निराशेच्या वातावरणात आहेत. आपला उद्योग कसा टिकवायचा, नोकरी कशी टिकवायची याची चिंता या दोघांनाही आहे. या मंदीला कारणीभूत नोटाबंदी, जीएसटीसह सरकारची धोरणे आहेत, असे सांगितले जात आहे. देशाला यातून बाहेर काढण्यासाठी सरकार उपाययोजना करीत आहे. मंदी जाईल तेजी येईल. देशाच्या आर्थिक विकासाचा दर वाढेल, हा आशावाद सरकारलाही आहे. तसाच देशवासीयांनाही आहे. मंदीतही संधी शोधणारे यातून लवकर बाहेर पडणार आहेत. यामुळे प्रयत्न सोडून न देता निराशावादी न बनता यातून कसे बाहेर पडता येईल, याचा विचार सर्वांनीच करायला हवा. निश्चितपणे हेही दिवस जातील. पुन्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला भरभराटीचे दिवस येतील, या आशेवर सर्वजण आहेत. कोणतीही गोष्ट कायम राहात नाही, त्यामुळे आशावाद सोडू नये म्हणूनच तर म्हणतात, ‘उम्मीदपर दुनिया कायम हैं’.

Web Title: Optimism gives rise to survival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.