बँकेतील १० लाख कर्मचारी उतरणार रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST2021-02-23T04:36:29+5:302021-02-23T04:36:29+5:30
काेल्हापूर : आय. डी. बी. आय. तसेच दोन राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. यामुळे बँकिंग ...

बँकेतील १० लाख कर्मचारी उतरणार रस्त्यावर
काेल्हापूर : आय. डी. बी. आय. तसेच दोन राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. यामुळे बँकिंग क्षेत्रात अस्थिरतेचे वातावरण निर्माण होऊन ठेवीदारांचे पैसे असुरक्षित होण्याचा धोका आहे. त्यामुळे सरकारने खासगीकरणाचा प्रस्ताव मागे घ्यावा, या मागणीसाठी १५ आणि १६ मार्च रोजी देशातील राष्ट्रीयीकृत बँक बंद ठेवून १० लाख कर्मचारी रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे निमंत्रक देविदास तुळजापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज, सोमवारी काळ्या फिती लावून काम करणार आहे.
तुळजापूरकर म्हणाले, खासगीकरणामुळे १५ आणि १६ मार्चच्या आंदोलनात ९ संघटनांसह राष्ट्रीयीकृत बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, जुन्या जमान्यातील खासगी बँक आणि विदेशी बँकातील सफाई कर्मचारी ते अधिकारी सर्वजण सहभागी होणार आहेत. यामध्ये देशात १० लाख, राज्यात ६० हजार, तर कोल्हापुरात २६ राष्ट्रीयीकृत बँकांच्या ३०० शाखेतील सहा हजार कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र, कोल्हापूर युनियनचे सेक्रेटरी सूर्यकांत कर्णिक, धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.
चौकट
तर पुन्हा सावकारीराज
तुळजापूरकर म्हणाले, खासगी क्षेत्रातील अनेक मोठ्या बँका राष्ट्रीयीकृत बँकामुळेच वाचू शकल्या आहेत. नुकत्याच खासगी, अर्बन नागरी अशा तीन बँक बुडाल्या. येथील ठेवीदार हवालदिल झाले आहेत. अशी स्थिती असतानाच राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण केल्यास बँकिंग क्षेत्रात अस्थितरता निर्माण होणार असून बँकिंगवरील विश्वास उडेल. देशाची अर्थव्यवस्था अडचणीत येण्याचा धोका असून पुन्हा सावकारीराज सुरू होईल.
चौकट
चोरांच्या हातात चावी देण्याचा प्रकार
तुळजापूरकर म्हणाले, थकबाकीच्या तरतुदीमुळे (एनपीए) नफ्याची रक्कम तोट्यात जात आहे. या थकबाकीमध्ये ७० टक्के वाटा मोठ्या उद्योगांचा आहे. खासगीकरणामुळे बँकांचे नियंत्रण भांडवलदारांकडे जाणार आहे. ज्यांनी बँक लुटली तेच मालक होणार असून चोरांच्या हातात चावी देण्याचा हा प्रकार आहे. यामुळे सामान्य जनतेचे ७० लाख कोटी रुपये धोक्यात येण्याची शक्यता आहे.
चौकट
आंदोलनाचे टप्पे
२२ मार्च काळ्या फिती लावून काम
२३ मार्च आझाद मैदानावर धरणे
१ मार्च ‘खासगीकरणाला विरोध’ असे लिहिलेले मास्क लावून काम
१ ते १० मार्च प्रत्येक जिल्ह्यात धरणे आंदोलन, प्रस्ताव मंजूर करू नका, असे निवेदन खासदारांना देणार
चौकट
लढाईत जनतेला सहभागी करा
बँक खासगीकरणाचे परिणाम व संघटनेच्या आंदोलनाची भूमिका समजावून सांगण्यासाठी विश्वेश्वरय्या मेमोरिअल हॉलमध्ये सर्व राष्ट्रीयीकृत बँकांतील कर्मचारी, अधिकारी यांची सभा झाली. यावेळी देविदास तुळजापूरकर यांनी १५ आणि १६ मार्च रोजीच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. खासगीकरणामुळे ग्राहकांवर काय परिणाम होणार हे त्यांना माहितीपत्रक देऊन पटवून द्या, संघटनेच्या लढाईत त्यांना सहभागी करून घ्या, असे आवाहन केले.